ताराशंकर बन्दोपाध्याय हे हरहुन्नरी लेखक होते. १९३२ मध्ये त्यांची ‘चैताली घूर्णि’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्या. ‘गणदेवता’, ‘पंचग्राम’, ‘घर’, ‘अभिजन’, ‘विचारक’, ‘राईकमल’ आणि ‘ब्योमकेश बक्षी’ इ. कादंबऱ्या वैशिष्टय़पूर्ण आहेत. ज्ञानपीठविजेत्या ‘गणदेवता’ कादंबरीचे कथानक ग्रामीण भागातील अन्याय, जुलूमशाही दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळामास्तरभोवती फिरते. ‘जलसाघर’ (१९३७) कथासंग्रहामध्ये जमीनदारांच्या सरंजामशाही वृत्तीला लागलेली ओहोटी, उतरती कळा याचं चित्रण आहे. या कथानकावर चित्रपट काढून सत्यजित रे यांनी ही कादंबरी लक्षवेधी केली आहे. समाजात टॅक्सी ड्रायव्हरची होणारी विलक्षण पिळवणूक, अन्यायाची भीषणता व्यक्त करणारी एक श्रेष्ठ कादंबरी आहे- ‘अभिजन’. एका खुनाच्या खटल्याचा निर्णय देताना, कैचीत सापडलेल्या न्यायाधीशाचं चित्रण करणारी कादंबरी आहे-‘विचारक’. ‘राईकमल’ (१९३४)- या कादंबरीत त्यांनी कलावंतांचे जीवन, त्यांच्या सौंदर्यपिपासू वृत्तीची अखंड तृष्णा आणि सामाजिक नीतिमूल्ये यामधील संघर्ष काव्यात्मकतेने रंगवला आहे. ‘शताब्दीर मृत्यू’ (१९७१)- ही त्यांची शेवटची कादंबरी त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली आहे. कवी- या नाटकात नर्तकांच्या समूहाबरोबर गावोगाव भटकणाऱ्या जिप्सी कवीच्या आयुष्याचे चित्रण आहे. ‘व्योमकेश बक्षी’- ही त्यांची शोधकथा, हेरकथा आजही हिंदी दूरदर्शनवर प्रेक्षकप्रिय आहे. समाजाच्या तळागाळातील दुर्बल, गरीब, असहायांविषयीची त्यांच्या मनातील कणवभावना, त्यांच्या अनेक साहित्यकृतीतून व्यक्त झालेली दिसते. ‘छलनामयी’ (१९३७)- हा ताराबाबूंचा पहिला कथासंग्रह ‘जलसाघर’, ‘रसकली’, ‘हारोना सूर’, ‘रामधन्नू’, ‘चिरंतनी’ (१९६२), ‘जया’ (१९६८) इ. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. ‘कवि’, ‘आरोग्य निकेतन’ ही त्यांची नाटके रंगभूमीवरही गाजली. याशिवाय ‘कालिंदी’, ‘दुइपुरुष’ (१९४२), ‘युगविप्लव’ इ. नाटकेही महत्त्वाची ठरली. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com मोजू या, ‘क्षेत्रफळ’ आपल्याला जी वस्तू मोजायची आहे, तिच्यासारखाच एकक मोजण्यासाठी घ्यावा लागतो. वजन मोजायला ग्रॅम किंवा किलोग्रॅम, लांबी मोजायला सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर अशी एकके आपण वापरतो. क्षेत्रफळ मोजताना मुलांचा सुरुवातीला जरा गोंधळ होतो, कारण आयताची लांबी, रुंदी सेंटिमीटरमध्ये दिलेली असते. लांबी व रुंदी यांचा गुणाकार केला की क्षेत्रफळ मिळते, हे सूत्रही आठवत असते; पण लांबी ८ सेंटिमीटर, रुंदी ७ सेंटिमीटर, गुणाकार ५६, तर क्षेत्रफळ ५६ सेंटिमीटर लिहिलं तर उत्तर चूक कसं, हे चटकन ध्यानात येत नाही. क्षेत्रफळ मोजण्याचे एकक सेंटिमीटर नसून चौरस सेंटिमीटर आहे. म्हणून क्षेत्रफळ ५६ चौरस सेंटिमीटर असं लिहायला हवं. क्षेत्रफळ छोटय़ा चौरसांनी मोजतात, लांबीच्या एककाने नव्हे. जर एखादे तळे गोल किंवा आयताकृती नसून जरा लांबट किंवा वेगळ्या आकारात असेल, तर त्याचे क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहू. तळ्याचा आकार आलेख कागदावर काढून तळ्याच्या आतले चौरस रंगवा. चौरस मोजताना, जे रंगीत चौरस अध्र्याहून कमी आहेत, ते मोजू नका. रंगवलेल्या चौरसांपकी जे पूर्ण चौरस आहेत आणि अध्र्याहून जास्त चौरस आहेत; असे एकूण किती चौरस आहेत, ते मोजा. म्हणजे तळ्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती चौरस एकक आहे, ते समजेल. आलेख कागदावर चौरस जेवढय़ा लहान आकाराचे असतील तेवढी मापनाची अचूकता जास्त. प्रमाणासाठी तळ्याचा एक मीटर लांबीचा भाग बरोबर आलेख कागदावरील एक सेंटिमीटर असा घेतलेला असेल तर एक चौरस सेंटिमीटर बरोबर एक चौरस मीटर असेल. जर पाच मीटर म्हणजे एक सेंटिमीटर असे घेतलेले असेल तर एक चौरस सेंटिमीटर बरोबर पंचवीस चौरस मीटर असे प्रमाण ठरवता येते. ज्या वस्तूचे क्षेत्रफळ मोजायचे आहे, त्याला सोयीचे असे एकक घेतात. लहान घरासाठी चौरस मीटर चालेल. मोठय़ा जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी याहून वेगळी एकके उदाहरणार्थ गुंठा व एकर आहेत. गुंठा म्हणजे साधारण १०० चौरस मीटर, एकर हा ४००० चौरस मीटरपेक्षा थोडा मोठा असतो. एक चौरस किलोमीटर हा १०,००,००० किंवा १०६ चौरस मीटर एवढा आहे. - डॉ. मंगला नारळीकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org