तेहरानमधील शाह मोहम्मद रजा पेहेलवीच्या कारकीर्दीत १९६० ते १९७० च्या दशकात अनेक नवीन प्रासाद आणि रस्ते बांधणीमुळे शहराचा वेगाने कायापालट झाला. या काळात सुरू झालेले ‘मिलाद टॉवर’ या उत्तुंग मनोऱ्याचे बांधकाम पुढे इस्लामी क्रांतीकाळात बंद पडले. १९७९ च्या राज्यक्रांतीनंतर परत सुरू झालेले ४३५ मिटर्स उंचीच्या या मनोर्याचे काम २००७ साली पूर्ण झाले. मिलाद टॉवर हा सध्या तेहरानची ओळख बनलाय. १९७९ च्या राज्यक्रांतीनंतर सर्व जागतिक प्रसार माध्यमांनी तेहरानमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती विषयी एक अति कर्मठ, कट्टर इस्लाम धर्मिय शहर, पाश्चात्त्य आधुनिकतेला सतत विरोध करणारे शहर असे चित्र रंगवले. परंतु त्यानंतरच्या अलीकडच्या दोन दशकात परिस्थिती बदलली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, वस्त्रोद्योग, साखर, सिमेंट आणि रसायन अशा विविध औद्योगिक उत्पादनांमुळे तेहरान सध्या एक गजबजलेलं औद्योगिक शहर बनलंय. नव्वद लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या तेहरान नगर प्रशासकीय व्यवस्थेसाठी तेहरानचे २२ विभाग केलेले आहेत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपकी एकाचे नाव आहे ‘महात्मा गांधी स्ट्रीट’ तर दुसऱ्याचे नाव ‘मुहम्मद अली जिना स्ट्रीट’! तेहरान वासियांना सर्वात मोठा प्रश्न भेडसावतो तो वायूप्रदूषणाचा आणि अधूनमधून बसणाऱ्या भूकंपांच्या हादऱ्यांचा. जागतिक सर्वाधिक वायू प्रदूषणग्रस्त शहरांपकी तेहरान वरच्या क्रमांकावर आहे. यापकी ८० टक्के प्रदूषण आहे ते मोटार वाहनांमुळे. बाकीचे २० टक्के औद्योगिक प्रदूषण. प्रदूषण कमी करण्यासाठी नगर प्रशासनाने टॅक्सी आणि बसगाडय़ांसारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने पेट्रोल वा डिझेलवर चालविण्याऐवजी कॉम्प्रेस्ड गॅसवर चालविणे सुरू केले. शहरात वेळोवेळी प्रदूषणाची असलेली पातळी दाखविणारे फलक अनेक ठिकाणी लावले आहेत. तरीही प्रदूषण नियंत्रणाखाली येत नाही म्हणून सरकारने २०१० साली ठराव केला की, देशाची राजधानी तेहरानहून सेमनान किंवा शाहरूद अथवा एस्फहान या शहरांमध्ये हलवायची. अनेक औद्योगिक प्रकल्प आणि विद्यापीठे तेहरानऐवजी दुसऱ्या प्रांतात नेण्याचा ठरावही मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात आजही तेहरानच राजधानी आहे. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com कुसुम नावाचा कल्पवृक्ष वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर सर्व वृक्षांना पोपटी रंगाची पालवी फुटते. मात्र कुसुम वृक्षास सुरुवातीला लालसर रंगाची पालवी फुटते. या वेगळ्या मोहक रंगामुळे तो सहजपणे ओळखता येतो. या वृक्षाला इंग्रजीत लॅक ट्री, हनी ट्री, सिलोन ओक गॅहलॅक ट्री अशी नावे असून संस्कृतमध्ये या वृक्षाला कोशाग्र, रक्ताग्र, कृमितरू असे संबोधले जाते. पाने एकत्रित मोठी व संयुक्त अशा तीन जोडय़ांत असल्यामुळे त्याचे पर्यायी जातीनाम ट्रायजुगा आणि शास्त्रीय नाव Schleichera colorata असे आहे. पर्णिका समोरासमोर लांबट, बोथट असून त्यांना हिरवी चकाकी असते. या वृक्षास पालवी फुटत असतानाच मोहोर येतो, पण पानांच्या दाटीमुळे तो लक्षात येत नाही. त्याच्या मोहक मंद सुगंधामुळे मोहोर आल्याचे लक्षात येते, पावसाळ्यानंतर फळधारणा होते. त्याचे फळ लांबट टोकदार असून त्यावर काटे असतात. फळे आंबटगोड आणि चविष्ट असतात. पक्षी, खारी यांचे ते आवडते खाद्य आहे. या फळांमध्ये एक व दोन बिया असतात. त्यावर मांसल भाग असतो. या बियांचे लोणचे करतात. तपकिरी रंगाच्या गुळगुळीत बियांमध्ये २५ ते ३० टक्के तेल असते. या तेलामुळेच या वृक्षाला ओलिओसा (तेल असलेला) हे नाव मिळाले आहे. या तेलाचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. दिव्यामध्ये जाळण्यासाठी, वंगण म्हणून तसेच महत्त्वाचे म्हणजे साबण तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्वी केशवर्धक तेल ‘मकासरऑइल’ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जाई. बियांची पूड ही जनावरांच्या चिघळलेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरली जाते. खोड आणि फांद्यांमध्ये ९ टक्के टॅनिन असते. त्यामुळे कातडी कमावण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कुसुंबीचे लाकूड टणक आणि जड असते. घराचे बांधकाम, तेलाच्या घाणी, शेतीची अवजारे बनवण्यासाठी हे लाकूड उपयुक्त आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कुसुम वृक्ष मुबलक प्रमाणात आढळतो व त्याची जोपासना योग्य रीतीने केली जाते. जंगल क्षेत्राची वाढवण्यासाठी, मातीची धूप कमी करण्यासाठी वृक्षाची मोठय़ा प्रमाणात लागवड केल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचे होईल. - एस. डी. सत्से (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org