विख्यात भाषाशास्त्री म्हणून गणले गेलेले वकील विल्यम जोन्स १७८३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या बेंगॉल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पदावर कलकत्त्यात रुजू झाले. यापूर्वी आठ भाषांचे तज्ज्ञ जाणकार असलेल्या विल्यमनी भारतातील हिंदू, मुस्लीम कायद्याचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा आत्मसात केली, हिंदू धर्मग्रंथ, पुराणे वाचली. अरेबिक आणि पर्शियन भाषा तर त्यांना यापूर्वीच येत होत्या. जोन्सप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना भारतीय भाषा संस्कृती, कला, इतर वैविध्यांनी प्रभावित केले होते. अशा अनेकांनी आपली व्यक्तिगत पुस्तके, साधने मिळवून अभ्यास चालू केला होता. परंतु विल्यम जोन्सच्या डोक्यात या प्राच्य विद्यांचा अभ्यास आणि संशोधनासाठी एक सुनियोजित संस्था भारतात स्थापन करावयाचे घोळत होते. त्यांना तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचाही या गोष्टीसाठी पाठिंबा होता. विल्यमनी यासाठी पत्राद्वारे ३० ब्रिटिश उच्चाधिकाऱ्याना चच्रेसाठी बठकीस बोलावले. १५ जानेवारी १७८४ मध्ये प्रमुख न्यायाधीश रॉबर्ट चेंबर्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बठकीत विल्यमनी अशा प्रकारच्या संस्थेची आवश्यकता आणि त्यासाठी आपण केलेले नियोजन विशद केले. सर्व उपस्थितांनी अशी प्राच्य विद्यांच्या संशोधनांसाठी संस्था स्थापन करण्यास दुजोरा दिला आणि विल्यम जोन्सना या संस्थेचे पहिले अध्यक्ष निर्वाचित करून ‘द एशियाटिक सोसायटी’ स्थापन झाली. या संस्थेच्या नावामध्ये १७८४ ते १८३२ - ‘द एशियाटिक सोसायटी’, १८३२ ते १९३५ -‘ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’, १९३६ ते १९५१ - ‘द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ आणि १९५१ पासून पुढे सध्या ‘द एशियाटिक सोसायटी’ असे थोडेफार बदल झाले. एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेच्या वेळी ‘आशिया खंडाच्या भौगोलिक सीमांमधील प्रदेशातील मानव आणि निसर्गनिर्मित कृतींचे संशोधन आणि अभ्यास’ हे संस्थेचे प्रमुख कार्य राहील असे औपचारिकपणे जाहीर करण्यात आले. विल्यम जोन्सचा १७९४ साली मृत्यू होईपर्यंतची दहा वर्षे विल्यम या सोसायटीचे अध्यक्ष होते आणि त्यांचे घर हेच सोसायटीचे कार्यालय होते. कलकत्त्यात सरकारने दिलेल्या जमिनीवर १८०८ मध्ये ग्रंथसंग्रह आणि वस्तुसंग्रह तसेच कार्यालयासाठी सोसायटीची स्वतची इमारत बांधली गेली. sunitpotnis@rediffmail.com