वाइंडिंग मशीनवर जे मुख्य भाग असतात, त्या प्रत्येक भागाचे विशिष्ट कार्य असते. रिंग बॉबीन अडकवायला जो स्टँड असतो, त्यावर ठरावीक कोनात लाकडी किंवा लोखंडी खुंटय़ा बसवलेल्या असतात. त्यामुळे त्या बॉबीनवरचे सूत व्यवस्थित उलगडले जाते. सुताला यंत्रावर योग्य दिशा देण्याचे काम गाईड करतो. हे गाईड तारेचे किंवा चिनी मातीचे असतात. त्यांची घडण धागा ओढण्यास सोपी जावी अशी असते. सूत व्यवस्थित गुंडाळले जाण्याकरिता सुतावर काही प्रमाणात ताण दिला जातो. हा ताण त्या सुताच्या दर्जाप्रमाणे/ सुतांकाप्रमाणे बदलत असतो. त्याकरिता कमी/जास्त रिंग ठेवून बदल केला जातो. यामुळे सुतातील कमकुवत जागा काढून टाकायला मदत होते. सुतातील दोष जसे गाठी, गुठळ्या काढण्यासाठी 'क्लिअरर' हा भाग असतो. ठरावीक मापाचे छिद्र असलेल्या प्लेटमधून धागा पाठवला जातो. सुतात गाठ, गुठळी आल्यास गाठ तुटते, ते परत बारीक गाठीने जोडून घेताना तो दोष दूर केलेला असतो. जाडय़ाभरडय़ा, मध्यम आणि तलम सुताकरिता छिद्राचा आकार बदलावा लागतो. त्याची सोय प्लेटवर केलेली असते. कोणत्या सुताकांचे सूत मशीनवर चालवले जाणार त्यानुसार सुरुवातीलाच छिद्राचा आकार योग्य प्रमाणात करून ठेवतात. सूत कोनवर एकसारखे गुंडाळताना कोन एकाच वेगानं फिरायला हवा, कारण जसजसे सूत गुंडाळले जाते, तसतसे कोनाचा व्यास वाढत जातो. त्यामुळे कोनाच्या पृष्ठभागाची गती वाढत जाते. गती एकच ठेवण्यासाठी कोन ड्रमच्या साहाय्याने फिरवला जातो. ड्रमचा व्यास कायम असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागाची गती एकसारखीच राहते. या ड्रमवर खाचा असतात. या खाचेतून सूत कोनवर एकसारखे गुंडाळायचे काम केले जाते. त्यामुळे धागा एकमेकांत न गुंतता व्यवस्थितपणे कोनवर गुंडाळला जातो. आता नवीन पद्धतीच्या यंत्रात इलेक्ट्रॉनिक्स क्लीअररचा वापर करतात. तसेच तुटलेल्या सुताच्या गाठी मारणे, भरलेला कोन बाजूला करून, नवीन कोन लावणे इत्यादी कामे स्वयंचलित पद्धतीने यंत्रावर होतात. या सर्व सुधारणांचा फायदा म्हणून आपल्याला चांगल्या दर्जाचे सूत मिळते. तसेच या यंत्राची गती पूर्वीच्या यंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे कामही लवकर होते. महेश रोकडे (कोल्हापूर)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org संस्थानांची बखर - रतलाम राज्य स्थापना पश्चिम मध्यप्रदेशातील, गुजरात प्रांताच्या सीमेजवळचे रतलाम हे सध्याचे जिल्ह्याचे ठिकाण बिटिशकाळात महत्त्वाचे संस्थान होते. संस्थान स्थापनेपूर्वीच्या काळात हा प्रदेश मोगल साम्राज्यात अंतर्भूत होता. बादशाह शाहजहानला हत्तींची झुंज पाहण्याची आवड होती. अशा हत्तींच्या झुंजी आयोजित करून ते पहायला सरदार, राजे यांना तो आमंत्रण देत असे. राठोड राजपुतांचा प्रतिनिधी म्हणून रतनसिंहजी या जोधपूर महाराजाच्या पणतूस बादशाहने एका झुंज कार्यक्रमास निमंत्रण दिले होते. आग्राच्या पॅलेस गार्डनमध्ये झुंज चालू असताना एक हत्ती अचानक उधळला आणि शाहजहानच्याच दिशेने धावू लागला. सर्व उपस्थित लोक जिवाच्या आकांताने सरावैरा धावत सुटले. अशावेळी रतनसिंह त्या हत्तीवर चढून त्याने त्या हत्तीला काबूत आणले. बादशाहाचा प्राण वाचविला म्हणून त्याने रतनसिंहाला १६५२ मध्ये रतलाम आणि आसपासचा काही प्रदेश जहागीर दिला. रतनसिंहाने या प्रदेशावर आपले छोटे राज्य स्थापून रतलाम येथे राजधानी केली. राज्य स्थापन करून रतनसिंह मोगल सन्यात सेनाधिकाऱ्याचे कामही करीत होता. युद्धांमध्ये शौर्य गाजविल्यामुळे बादशाहाने त्याला राजपुतान्यातलाही काही प्रदेश इनाम दिला. पुढे बादशाहाने रतनसिंहाला माळव्याची सुभेदारी देऊन २००० जाट आणि २००० घोडेस्वारांचा मनसुब देऊन त्याचा सन्मान केला. बादशाह शाहजहानचे दोन पुत्र मुराद आणि औरंगजेब हे दख्खनची सुभेदारी सांभाळीत असताना बादशाहाच्या मृत्यूची अफवा पसरली. मोगल तख्ताच्या वारसा हक्कावरून शाहजादा दारा शुकोह आणि औरंगजेबामध्ये झालेल्या युद्धात रतनसिंह बादशाहाच्या शाही सन्याकडून लढत असताना मारला गेला. रतनसिंहाच्या मृत्यूनंतर रतलामच्या राज्याचे आजूबाजूच्या राजांनी व सरदारांनी लचके तोडून त्याचे नाममात्र अस्तित्व शिल्लक राहिले. पुढे औरंगजेबाने उरल्यासुरल्या रतलाम राज्याचा विध्वंस केला. सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com