भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी ऊर्फ बाळासाहेब या औंधच्या शेवटच्या अधिकृत राजांची कारकीर्द (१९०९ ते १९४७) लोककल्याणकारी आणि संस्थानाला वैभवसंपन्न तसेच सुसंस्कृत बनविणारी ठरली. १९३५ साली ते इंदूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते स्वत उत्तम चित्रकार, साहित्यिक आणि कीर्तनकार होते. रामायणाचा अभ्यास करून त्यांनी संपूर्ण रामायणाची चित्रमालिका स्वत रंगविली. औंधच्या ‘भवानी संग्रहालया’त ही चित्रे आजही पाहावयास मिळतात. (यापैकी काही चित्रे सध्या एका प्रदर्शनानिमित्ताने, २० सप्टेंबर २०१५ पर्यंत मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला दालनात पाहावयास मिळत आहेत.) ‘भवानी संग्रहालय’ हे चित्र, शिल्प आणि ग्रंथ यांचे संग्रहालय १९३८ साली भवानराव पंतप्रतिनिधींनी जनतेसाठी खुले केले. राजा रविवर्मा यांची ‘सैरंध्री’, ‘दमयंती’ (नलराजा सोडून गेल्यानंतर) ही चित्रे , तसेच चित्रकार ठाकुरसिंह यांचे प्रसिद्ध ‘ओलेती’ हे चित्र येथे आहे. हेन्री मूर या जगप्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकाराचे ‘मदर अँड चाइल्ड’ हे छोटेखानी शिल्प याच संग्रहालयाच्या खजिन्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून, भारतातील हे हेन्री मूरचे एकमेव शिल्प आहे. या संग्रहालयालगतच्या ग्रंथालयात १२,५०० पुस्तके व ३५०० हस्तलिखिते आहेत. भवानरावांचा मृत्यू १९५१ साली झाला. त्यांचे पुत्र परशुराम पंत यांनी नॉर्वे, इटली, इंग्लंड, आफ्रिकन देशांमध्ये भारताचे राजदूत वा उच्चायुक्त या पदांवर काम केले. सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com आसाम रेशीम उद्योग सर्व भारतभरातील विणकामाची वैशिष्टय़े ही त्या त्या प्रांतातील साडीशी निगडित आहेत. आसामची संस्कृती तर आसामी रेशीम आणि त्याचे विणकाम याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आसाममध्ये मुख्यत्वे तीन प्रकारच्या रेशमाचे उत्पादन होते. हे तीनही प्रकार ‘जंगली रेशीम’ या वर्गवारीत समाविष्ट होतात. तुती रेशमाचे उत्पादन आसाममध्ये जवळपास होतच नाही. सोनेरी मुगा रेशीम, टसर रेशीम, आणि उबदार ‘एरी’ रेशीम हे तीन प्रकार आसामात उत्पादित केले जातात. यामध्ये टसर रेशीम ओक वृक्षाच्या पानावर वाढवलेल्या रेशीम किडय़ापासून मिळते. हे रेशीम बदामी किंवा फिकट तपकिरी रंगाचे असते. ऐन आणि अर्जुन या झाडांच्या पानावर वाढवलेल्या किडय़ांपासून मिळणारे टसर रेशीम रुपेरी, पिवळसर, तपकिरी, हिरवट ह्य़ा रंगाचे असते. मुगा रेशीम सोनेरी रंगाचे असते. हे रेशीम चमकदार आणि मऊ असते. तसेच याचा टिकाऊपणा पण चांगला असतो. या रेशमाच्या नसíगक रंगछटेमुळे साडीत हे रेशीम जरीऐवजी पण वापरले जाते. रेशमातील सर्वात महाग जात अशी मुगा रेशमाची ख्याती आहे. भरतकामासाठी या रेशमाचा विशेष उपयोग केला जातो. पूर्वी राजे-महाराजांसाठी जी जरीकाठी वस्त्रे - जसे धोतरे, उपरणी, शेले, साडय़ा तयार करताना मुगा रेशमाचा वापर केला जात होता. पूर्वी त्याबरोबर खरा जर वापरायचे, पण खऱ्या जराकरिता लागणारे सोने-चांदी महाग असल्यामुळे आता त्याऐवजी कृत्रिम जराचा वापर केला जातो. साडी विणताना स्थानिक विणकरांची वैशिष्टय़े आणि आसामातील जैवविविधतेचा केलेला वापर प्रकर्षांने लक्षात येतो. स्थानिक पाने, फुले, पक्षी, प्राणी आणि भौगोलिक आकार यांचा वापर नक्षीकामात प्राधान्याने केला जातो. पूर्वी मुगा रेशमावर रंगाई किंवा विरंजन क्रिया करता येत नाही, अशी समजूत होती. पण ती चुकीची होती असे आता सिद्घ झाले. इतर रेशमाप्रमाणेच मुगा रेशमाची रंगाई करता येते. ह्य़ा रेशमाने तयार केलेले वस्त्र हाताने धुणे गरजेचे आहे. प्रत्येक धुण्याबरोबर रेशमाची चमक वाढते. धुलाईबाबत योग्य काळजी घेतल्यास वापरणाऱ्याला कंटाळा येईल पण हे वस्त्र फाटत नाही. - दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई office@mavipamumbai.org