रिओ-दी-जानेरो येथे २०१२ साली संपन्न झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेनंतर, सप्टेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत १९३ राष्ट्रांनी एकूण १७ उद्दिष्टे असणारा २०३० सालासाठीचा शाश्वत विकास अजेण्डा स्वीकारला. ही उद्दिष्टे व त्याअंतर्गत असणारी १६९ छोटी लक्ष्ये सदस्य राष्ट्रांनी २०१६ ते २०३० या कालावधीत साध्य करायची आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ७० वर्षांच्या कार्यकाळात सर्वात जास्त देशांनी मान्यता दिलेला हा अजेण्डा आहे. या उद्दिष्टांची तीन प्रमुख वैशिष्टय़े आहेत : (१) ‘युनिव्हर्सल’ : ही उद्दिष्टे ‘वैश्विक’ आहेत, म्हणजेच जगातील विकसित, विकसनशील, अविकसित अशा सर्वच राष्ट्रांना, समूहांना, संघटनांना ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक आणि संघटित प्रयत्न करावयाचे आहेत. (२) ‘इंटिग्रेशन’ : ही १७ उद्दिष्टे दिसायला वेगवेगळी असली तरी एकमेकांशी जोडलेली आहेत, त्यांच्यात समन्वय आहे. ती एकमेकांपासून वेगळी ठेवून साध्य करता येणार नाहीत. (३) ‘ट्रान्सफॉर्मेशन’ : ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या सध्याच्या जीवनशैलीत, राहणीमानात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. थोडक्यात, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा अतिशय जपून वापर करावयाचा आहे. आता उद्दिष्टे पाहू.. उद्दिष्ट क्र. १ ते ६ : संपूर्ण जगात, विशेषत: दारिद्रय़ात खितपत पडलेल्या आणि समाजात मान्यता नसणाऱ्या मानवी समूहांचा सामाजिक व आर्थिक विकास करता यावा यासाठी २०३० पर्यंत गरिबीच्या समस्येचा संपूर्ण नायनाट होईल, एकही व्यक्ती भुकेली राहणार नाही, सर्वाना सुदृढ आरोग्य तसेच गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता येईल, उत्तम शिक्षण मिळेल, लिंगभावावर आधारित विषमतेचा नायनाट होईल आणि सर्वाना शुद्ध पाणी मिळेल, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील- अशा रीतीने सर्वच सदस्य राष्ट्रांनी व्यवस्था निर्माण करणे अपेक्षित आहे. उद्दिष्ट क्र. ७ ते १५ : समृद्धीसाठी स्वच्छ ऊर्जेचा शाश्वत पुरवठा, आर्थिक विकासाच्या जोडीला सर्वाना सन्मानजनक काम मिळणे, उद्योगामध्ये शाश्वत तत्त्वांचा वापर करून समृद्धी आणणे, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, उपभोग्य वस्तूंच्या खरेदीचा अतिरेक टाळणे, शहरातील व्यवस्था शाश्वत बनवण्यासाठी विशेष लक्ष देणे, याचबरोबर हवामान बदलाचे परिणाम कमी करणे, जमिनीवरील व पाण्यातील जीवसृष्टीचे संरक्षण करणे. उद्दिष्ट क्र. १६ व १७ : शांतता, न्याय व त्यासाठी गरजेच्या संस्थात्मक रचना, वैज्ञानिक माहिती व तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी, आर्थिक मदतीच्या सतत पुरवठय़ासाठी, व्यापारामधील विकसनशील देशांचा वाटा वाढण्यासाठी भागीदारी निर्माण करणे अपेक्षित आहे. - डॉ. संजय जोशी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org