मल्याळम कवी, गीतकार व पर्यावरणतज्ज्ञ ओ. एन. व्ही. कुरुप यांना २००७चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी मल्याळम भाषेचा चार वेळा ज्ञानपीठाने सन्मान झाला होता. केरळच्या कोल्लम जिल्हय़ातील छावरा या गावी २७ मे १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. केरळातील सांस्कृतिक जीवनावर कवी ओट्टापलक्कल नीलकंगन वेल्लुकुरुप म्हणजे मल्याळी जनतेचे लाडके ‘ओएनव्ही’ यांनी गेली सहा दशके मोठीच छाप पाडली होती. त्यांच्या वडिलांचा संगीत व कथकलीचा मोठा व्यासंग होता. ओएनव्ही यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. १९४६ मध्ये त्यांनी लिहिलेली ‘मुनोटू’ ही पहिली कविता लिहिली. कौलमच्या श्रीनारायण कॉलेजमधून ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी तिरुवनंतपूरमच्या विद्यापीठात मल्याळममध्ये उच्चशिक्षण घेतले. नंतर शिक्षण क्षेत्रातच १९५७ मध्ये एर्नाकुलमच्या महाराजा कॉलेजात त्यांनी अध्यापन सुरू केले. ते लोकप्रिय कवी व गीतकार होते. मल्याळी बोलीभाषेमुळे त्यांच्या गीतांनी जनमानसाची पकड घेतली होती. दैनंदिन जीवनातील प्रतिमाचित्रण त्यांच्या काव्यातून दिसते. वेदनेची छाया हे त्यांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. कुरुप यांच्या कविता सुरुवातीच्या काळात तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणाऱ्या होत्या व नंतर त्या जीवनातील निखळ आनंदाकडे वळल्या. ‘निंगलेन्ने कम्युनिस्टाकी’ या नाटकाद्वारे त्यांनी दक्षिण केरळात कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचार केला. वर्गसंघर्ष मांडला. त्यांच्या नाटकांपेक्षा गीते लोकांच्या जास्त स्मरणात आहेत. ओएनव्ही हे कवितांपेक्षाही गीतांमुळेच लोकांच्या आठवणीत राहतील. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तोवर २०० चित्रपटांत ९०० गीते त्यांनी लिहिली. त्यांची अनेक गाणी देवराजन, दक्षिणामूर्ती, सलील चौधरी, रवि यांच्या संगीताचा साज घेऊन आली, लोकप्रिय झाली. ‘वैशाली’ या चित्रपटातील गाण्यासाठी कुरुप यांना १९८९ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘उज्जयिनी’ आणि ‘स्वयंवरम्’ यांसारख्या दीर्घ कवितांद्वारा त्यांनी मल्याळी कवितांना वेगळे वळण दिले. त्यांनी निवेदनाची नवी शैली विकसित केली. एकूण ३० काव्यसंग्रह प्रकाशित झाले. पर्यावरण संरक्षण आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि या जनआंदोलनाला नव्याने स्फूर्ती दिली. या विषयावर काही मार्मिक कविताही लिहिल्या. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com मानवी गुणसूत्रांची संख्या आपले रंगरूप आणि गुणदोष हे आपल्या पेशींमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांवरून ठरत असतात. पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेपर्यंत ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ग्रेगर जॉन मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून सर्वप्रथम अनुवंशशास्त्राचे नियम मांडले. मेंडेल ह्य़ांच्या हयातीत ते मान्य झाले नाहीत पण त्यानंतर १९०० साली ह्य़ुगो डी व्रिएस, कार्ल कोरेन्स आणि एरिच व्हॉन त्शेरमॅक तीन शास्त्रज्ञांनी स्वतंत्ररीत्या त्यावर संशोधन केले आणि त्या नियमांची सत्यता आणि महत्त्व जगाला पटले. त्यानंतर १९०२ साली वॉल्टर सटन आणि थिओडोर बॉवेरी ह्य़ा दोन शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतामधून ह्य़ा आनुवंशिकतेला आपल्या पेशीत असणारी गुणसूत्रे जबाबदार असतात, हा विचार पुढे आला. ही गुणसूत्रे डीएनएच्या लांबच लांब धाग्यांची बनलेली असतात हे देखील शास्त्रज्ञांना संशोधनातून माहीत झाले. मग प्रश्न आला, तो मानवी पेशीतल्या गुणसूत्रांच्या संख्येचा! मानवी पेशींचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून गुणसूत्रांची संख्या मोजण्याचा पहिला प्रयत्न थिओफिलिस पेंटर या शास्त्रज्ञाने केला. १९२३ साली त्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मानवी गुणसूत्रांची संख्या ४८ असल्याचे म्हटले. त्यानंतर पुढची २३ वर्षे शास्त्रज्ञांचा हा समज कायम होता. पण १९५६ मध्ये जो टीजो आणि अल्बर्ट लेवन या दोन शास्त्रज्ञांनी मानवी गुणसूत्रांची संख्या ४८ नसून ती ४६ असल्याचे सिद्ध केले. पेशीतली गुणसूत्रे केवळ पेशीविभाजनाच्या वेळीच स्पष्टपणे दिसू शकतात. एरवी ती वेगवेगळी नसून एका लांबच लांब अखंड धाग्याच्या स्वरूपात असतात. टीजो आणि लेवन यांनी वनस्पतीपासून मिळणाऱ्या कोल्चिसीन या रसायनाचा वापर करून पेशीविभाजनाच्या वेळी जेव्हा गुणसूत्रे सर्वाधिक स्पष्टपणे दिसतात. त्याच स्थितीत पेशीविभाजन थांबवून गुणसूत्रांची मोजणी केली. पुढच्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञान झपाटय़ाने प्रगत होत गेले. आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर टीजो आणि लेवन यांचे निष्कर्ष अधिक सहजतेने पडताळता आले आणि ते १०० टक्के बरोबर असल्याचे सिद्ध झाले. इतकेच नाही तर प्रत्येक गुणसूत्र वेगळे ओळखता येऊ लागले. ज्याचा अनुवंशशास्त्राच्या अभ्यासाला अधिकाधिक फायदा झाला. आता तर शास्त्रज्ञ गुणसूत्रांवरील नायट्रोजन संयुगांचा क्रमही शोधण्यात यशस्वी झाले आहेत. - प्रिया लागवणकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org