बेरिलियम हे अणुक्रमांक चार असलेले मूलद्रव्य असून अल्कलीमृदा धातू या दुसऱ्या गणातील पहिले मूलद्रव्य आहे. पृथ्वीच्या कवचात तसेच अंतराळात याचे प्रमाण अत्यल्प आहे. सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून बेरिलियमचे खनिज ‘बेरिल’ इजिप्तमधील टॉलेमी राजवटीत वापरल्याचा उल्लेख आहे. पहिल्या शतकात रोमन निसर्गतज्ज्ञ थोरला प्लाइनी यांनी बेरिल आणि एमराल्ड (पाचू) सारखेच आहेत, असे नमूद केले आहे. १७६५च्या सुमारास रेनेजस्ट हॅवी (फ्रान्स) यांना बेरिल आणि एमराल्ड या दोन्ही स्फटिकांची रचना सारखी असल्याचे दिसून आले. त्यांनी लुईस-निकलस वॉकलिन या रसायनतज्ज्ञाला या पदार्थाचे विश्लेषण करायला सांगितले. १७९८ साली वॉकलिन याने एमराल्ड (पाचू) आणि बेरिल यांच्यापासून नवीन मूलद्रव्य शोधल्याचे सांगितले. या मूलद्रव्याची संयुगे चवीला गोड असल्याने, Annales de Chimie et de Physique या नियतकालिकाच्या सूचनेवरून या मूलद्रव्याला ‘ग्लुसिनियम किंवा ग्लुसिनम’ हे नाव दिले. पुढे एच. एम. क्लापरोट यांनी इट्रियम या मूलद्रव्याचीदेखील संयुगे गोड असल्याचे सांगितले. आता या नवीन मूलद्रव्याला ‘बेरिलिना’ असे संबोधण्यात आले. १८२८ साली फ्रिड्रिख व्हलर (जर्मनी) यांनी या मूलद्रव्याचा ‘बेरिलियम’ असा उल्लेख पहिल्यांदा केला. अनेक वर्षे ग्लुसिनियम व बेरिलियम ही दोन्ही नावे प्रचलित होती; पण १९५७ मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने बेरिलियम या नावाला अधिकृत मान्यता दिली. १८२८ साली फ्रिड्रिख व्हलर (जर्मनी) आणि अँटॉइन बसी (फ्रान्स) या दोघांनी जवळपास एकाच वेळी, पण स्वतंत्रपणे बेरिलियम धातू मिळवण्याची पद्धत शोधली. त्यांनी प्लॅटिनमच्या मुशीत, बेरिलियम क्लोराइड आणि पोटॅशियम एकत्र तापवून बेरिलियम धातू खनिजापासून वेगळा केला. बेरिलियमचे उत्पादन पहिल्या महायुद्धानंतरच जर्मनी, अमेरिका या देशांत सुरू झाले आणि त्यात मोठमोठे रासायनिक उद्योग सहभागी झाले. १९२१ साली जर्मनीतच बेरिलियमच्या उत्पादनाची रासायनिक प्रक्रिया आल्फ्रेड स्टॉक आणि हॅन्स गोल्डस्मिथ यांनी विकसित केली. १९३२ साली एका प्रयोगात जेम्य चॅडविक या शास्त्रज्ञाने रेडियमच्या ऱ्हासातून बाहेर पडलेल्या अल्फा कणांचा मारा बेरिलियमच्या नमुन्यावर केला तेव्हा न्यूट्रॉन कणांचे अस्तित्व लक्षात आले. त्यामुळे बेरिलियम हा धातू अणुभट्टीत न्यूट्रॉन कणांच्या निर्मितीसाठी वापरला जातो. - विजय ज्ञा. लाळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org अरबांचा भारत प्रवेश साधारणत: आठव्या शतकाच्या अखेरीस व्यापाराच्या उद्देशाने पश्चिम आशियातील अरबांचा दक्षिण िहदुस्तानातील मलबारात प्रवेश झाला. केरळच्या किनारपट्टीवर अरब व्यापाऱ्यांची नियमितपणे ये-जा वाढली आणि मल्याळी लोकांशी त्यांचे संबंध वाढले. अनेक अरब व्यापाऱ्यांनी केरळात स्थायिक होऊन िहदू स्त्रियांशी विवाह केले. या विवाहांमधून तयार झालेल्या मिश्र प्रजेला ‘मापला’ असे नाव पडले. मापला म्हणजे ‘महापिल्ला’ अर्थात मोठे मूल. थोडक्यात, मापला याचा मथितार्थ मोठय़ा सन्मानाचा, आदराचा पुरुष असा आहे. त्यामुळे केरळातील इस्लाम धर्मीयांना ‘मापला’ असेच नाव पडले. केरळातील क्रांगानूर येथील राजा चेरमाण पेरूमाळ याच्या संपर्कात काही मुस्लीम फकीर आले. त्या फकिरांनी महम्मद पगंबर आणि इस्लाम धर्माविषयी माहिती दिली आणि त्या धर्माबद्दल आकर्षण वाटल्यामुळे चेरमाण पेरूमाळने गुप्तपणे इस्लामची दिक्षा घेतली. मक्केच्या यात्रेला गेला असताना चेरमाणचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चेरमाणने त्याचा स्नेही मलिक-इब्न-दिनार याला केरळात जाऊन मशीद बांधून इस्लामचा प्रचार करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या सूचनेप्रमाणे मलिक-इब्न-दिनार हा त्रावणकोरातला मुख्य काजी झाला, त्याने अनेक ठिकाणी मशिदी स्थापन केल्या. केरळात मापला मुस्लिमांचे प्रमाण काण्णनूर (कण्णूर) येथे अधिक आहे आणि तेथे अद्याप मापला मुस्लिमांचा राजवंशही आहे. त्या काळात केरळात आलेले अरब लोक व्यापारी होते, कट्टर धार्मिक नव्हते आणि मूळच्या मल्याळी लोकांमध्ये मिळून मिसळून राहत, त्यांनी मल्याळी जीवनशैली स्वीकारली. इस्लाम धर्म स्वीकारणे अधिक चांगले अशी समजूत अनेक लोकांची त्या काळात झाली. मलबारातल्या मूळच्या राज्य व्यवस्थेत या मापलांचा समावेश होऊन त्यास इतरांचे हक्क प्राप्त झाले. वायव्येकडून उत्तर हिंदुस्थानात आलेल्या अफगाण, तुर्क वगरेंकडून तिथल्या मूळच्या लोकांवर जुलूम करून त्यांना मुसलमान करणे, छळ आणि कत्तली करणे असे प्रकार उत्तरेत चालू होते. त्या उलट केरळात आलेले अरब मुस्लीम मूळच्या मल्याळी लोकांमध्ये पूर्णपणे समरस झाले. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com