हेला म्हणजे रेडा आणि रांधणे म्हणजे स्वयंपाक करणे. ‘म्हशीनं रांधलं अन् हेल्यानं खाल्लं’ ही म्हण खूप पूर्वीच्या काळातली असावी. जेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव समाजात जोर धरून होता. आता काळ आला आहे तो स्त्री-पुरुष समानतेचा. आता स्त्रीचे काम फक्त चुलीपुढे बसून स्वयंपाक करणे इतकेच समजले जात नाही. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरते. आता वातावरण स्त्रियांच्या दृष्टीने बरेच सुखावह झाले आहे. पण आजही अनेक ठिकाणी घरातल्या बहुतेक कामांची भिस्त स्त्रीवरच आहे, असे चित्र दिसून येते. जी स्त्री घर, चूल नीट सांभाळते तिला आजही उजवे माप दिले जाते. तिच्याकडे कौतुकभरल्या नजरा वळतात. काही बायका जात्याच कुशल असतात, पण काही बायकांजवळ ते कौशल्य नसते. त्या ठाकठीकच रांधतात आणि त्यांचे घरदार ते निमूटपणे खालमानेने गोड मानून घेते, तसा हा सारा व्यवहार! एकंदरच सारा आनंदी आनंद! असाच काहीसा प्रकार आनंदीबाईंचा. त्यांना स्वत:ला खाण्याची आवड तशी कमीच. त्यामुळे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, अशी काहीशी स्थिती! निरसपणे संसार हाकावा त्यातला प्रकार. निगुतीने चार गोष्टी करतील, तर नावच नको. ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ असे म्हणावे आणि मोकळे व्हावे. अशी एकंदर परिस्थिती. त्यांच्याकडे बघून वाटायचे ‘म्हशीनं रांधलं अन् हेल्यानं खाल्लं’! काळ जसा पुढे जातो, तशा काही म्हणी कालबाह्य होऊ लागतात. पण अशा काही म्हणींमध्ये वर्तमानाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. ते बघणेही मजेशीर वाटते उदा. आत्ताच्या काळातील काही म्हणी बघू या.. ‘रहायला नाही घर म्हणे लग्न कर’, ‘उचलला मोबाइल लावला कानाला’, ‘माझी ती सर्दी..तुझा तो ओमायक्रॉन’, ‘नेता छोटा, कटआऊट मोठा’, ‘मिळवत्या मुलीला मागणी फार’, ‘नाव गंगाबाई आंघोळीला पाणी नाही’, ‘खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला अॅडमिशन!’ तुम्हालाही अशा अनेक म्हणी सुचतील. बघा सुचतात का? - डॉ. माधवी वैद्यmadhavivaidya@ymail.com