जीवाश्म खडकात आढळतात, म्हणून जीवाश्मांचा अभ्यास भूविज्ञानात करतात. पण जीवाश्म हे सजीवांचे अवशेष असल्याने त्यांचा अभ्यास जीवविज्ञानातही करतात. म्हणूनच पुराजीवविज्ञानाला, म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानशाखेला, भूविज्ञान आणि जीवविज्ञान यांच्या सीमारेषेवरील विज्ञानशाखा म्हणतात. अर्थात जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळणारी माहिती भूविज्ञानाच्या आणि जीवविज्ञानाच्या अभ्यासकांना सारखीच उपयुक्त असते. जीवाश्मांपासून मिळणारी जी विविध प्रकारची माहिती भूवैज्ञानिकांना उपयोगी ठरते, त्यात प्राचीन पर्यावरणाचा, म्हणजे पुरापर्यावरणाचाही समावेश असतो. पुरापर्यावरणाविषयी निष्कर्ष काढताना भूवैज्ञानिकांच्या मनात एक सूत्र असते. ते सूत्र आहे नैसर्गिक प्रक्रियांच्या कालातीत एकसमानतेचे. ते सूत्र सांगते की भूतकाळाविषयी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानकाळ गुरुकिल्ली म्हणून उपयोगी पडतो. हे सूत्र वापरून प्रवाळवर्गीय प्राण्यांच्या जीवाश्मांवरून पुरापर्यावरणाची माहिती कशी मिळते ते आपण पाहू. त्यासाठी आपल्याला आधी सध्या अस्तित्वात असणाऱ्या प्रवाळभित्ती कोणत्या प्रकारच्या पर्यावरण प्रणालीत विकसित होतात, हे शोधावे लागेल. ते शोधल्यास आपल्या असे निदर्शनास येईल की प्रवाळवर्गीय प्राणी हे निरपवादपणे सागरी जलचर आहेत. पाण्याचे तापमान २१ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअस इतके असेल तरच प्रवाळभित्ती विकसित होऊ शकतात. त्यामुळे ते फक्त उष्णकटिबंधीय पट्टय़ातच अस्तित्वात असतात. समुद्र उथळ असावा लागतो आणि पाणी अत्यंत स्वच्छ असावे लागते. त्यामुळे सूर्याचे ऊन प्रवाळभित्तींपर्यंत पोहोचते आणि तिथले शेवाळ प्रकाशसंश्लेषण करू शकतात. याखेरीज तिथल्या पाण्याची क्षारता ३२ ग्रॅम ते ४२ ग्रॅम प्रति हजार लिटर असावी लागते. या माहितीचा आधार घेऊन आणि नैसर्गिक प्रक्रियांच्या कालातीत एकसमानतेचे सूत्र वापरून प्राचीन कालखंडांत निर्माण झालेल्या प्रवाळभित्तींची निर्मिती होताना तत्कालीन पर्यावरण कसे होते, हे सांगता येते. त्यासाठी कच्छ जिल्ह्यातल्या अबडासा तालुक्यातल्या मणियारा किल्ल्याजवळ असणाऱ्या एका चुनखडकाचे उदाहरण घेऊ. हा चुनखडक म्हणजे सुमारे तीन कोटी वर्षांपूर्वी तिथे निर्माण झालेली प्रवाळिभत आहे. अर्थातच या चुनखडकात प्रवाळांचे जीवाश्म खूप मोठय़ा प्रमाणात सापडतात. आपण असे आता खात्रीपूर्वक म्हणू शकतो की हा चुनखडक निर्माण झाला, त्या काळात सागराने भूभागावर अतिक्रमण केले होते. तो समुद्र अगदी उथळ होता आणि त्यातले पाणी इतके स्वच्छ होते की सूर्याचे ऊन थेट तळापर्यंत पोहोचत असे. तिथल्या पाण्याचे तापमान २१ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअस असायचे, तर क्षारता ३२ ग्रॅम ते ४२ ग्रॅम प्रति हजार लिटर असायची.- डॉ. विद्याधर बोरकर मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org