भारतामधील सर्वात श्रीमंत शेतकरी उत्तराखंड राज्यामध्ये आहेत. या राज्यात असलेले प्रचंड मोठे वनक्षेत्र ही येथील शेतकऱ्यांची खरी बँक आणि या बँकेच्या रखवालदारीबरोबरच देशामधील लोकांना वनक्षेत्राचे महत्त्व सांगणारी भारत सरकारची एक मोठी संस्थासुद्धा राज्याच्या ‘डेहराडून’ या राजधानीच्या ठिकाणी १८७८ पासून कार्यरत आहे. तिचे नाव ‘भारतीय वन संशोधन संस्था’. निसर्गरम्य हिमालयाच्या कुशीमध्ये ४५० हेक्टर क्षेत्राच्या मध्यावर उभी असलेली संस्थेची इमारत म्हणजे रोमन ब्रिटिश स्थापत्य कलेचा एक आविष्कार आहे म्हणूनच तिला जागतिक वारसाचा दर्जा प्राप्त आहे. संपूर्ण विटांचे बांधकाम, उंच खांब आणि शेकडो कमानींनी नटलेले विस्तीर्ण कॉरिडॉर हे इमारतीचे वैशिष्टय़ आणि सभोवतालची हजारो ‘कापूर’ वृक्षांची शतकी आयुष्यमान प्राप्त झालेल्या झाडांची भर यामुळे मानव निसर्गाची अनोखी मत्री पाहण्यास प्रतिवर्षी हजारो देशी आणि विदेशी पर्यटक येथे येत असतात. वन अभ्यासकांसाठी येथील सात संग्रहालयांची दालने म्हणजे मौल्यवान खजिना आहे. जंगलांमधील लाकडांची विविधता, कीटकांचे विश्व, वृक्षापासून मिळणारी विविध उत्पादने, कागद आणि रेशीमनिर्मिती यांच्या चित्ररूप नसíगक प्रतिकृती भारतीय जंगलांची श्रीमंती दर्शवितात. या संस्थेत वनविषयक पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणसुद्धा दिले जाते. २००७ पासून या संस्थेस स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. येथील विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर होते. या संस्थेमधील काही अभ्यासक्रमांना जगभरातून मागणी आहे. त्यामध्ये जैवविविधता, लाकूडनिर्मिती विज्ञान, कागदनिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापन यांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. भारतीय वनसेवेत निवड झालेले शेकडो अधिकारी याच संस्थेने दिलेले आहेत. संग्रहालयातील वृक्षांचे नमुने, येथील वनस्पती उद्यान आणि ग्रंथालयामधील पुस्तकांचे अफाट विश्व पाहून डोळे दिपून जातात. वनशिक्षण, संवर्धन आणि संरक्षणाच्या शिक्षणाबरोबरच या संस्थेत जागतिक दर्जाचे संशोधनसुद्धा सातत्याने चालू आहे. भूतान हा आनंदी लोकांचा देश आणि तेथील त्यांच्या या आनंदात सहभागी असलेली तेथील ८० टक्के वनश्रीमंती जपून ठेवण्यामध्ये भारतीय वन संशोधन संस्थेचा फार मोलाचा वाटा आहे, ही संस्था अशिया खंडात वनक्षेत्रामधील एकमेव वृक्षविद्य्ोचे दालन आहे. - डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org रासपुतिन ग्रेगरी येफिमोविच नोविरव ऊर्फ रासपुतिन हा एकोणिसाव्या शतकातला व्यभिचारी, व्यसनी माणूस स्वत:भोवती गूढतेचे वलय निर्माण करून तत्कालीन झार निकोलस द्वितीय, सेंट पीटर्सबर्गमधील उमराव, सरदार यांच्या वरिष्ठ वर्तुळावर प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला. १८६९ साली सबेरियातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रासपुतिन दारूडय़ा, दुर्वर्तनी म्हणून परिसरात कुख्यात होता. शहरात किरकोळ नोकरी करीत असताना त्याची ओळख आणि सहवास एका विक्षिप्त साधूंच्या गटाबरोबर झाला. लवकरच त्याच्यात दैवीगुण असल्याचा बोलबाला होऊन सेंट पीटर्सबर्गच्या काही उमराव, धनिकांचे त्याच्याकडे येणेजाणे सुरू झाले. त्याच्या चमत्काराच्या कथा मोठय़ा चवीने सांगितल्या जाऊ लागल्या. तत्कालीन झार निकोलस द्वितीय कमालीचा दैववादी होता. आपला जन्म झाला त्यावेळचे नक्षत्र आपल्याला अनुकूल नव्हते, त्यामुळे आपली शोकांतिका होणार असे त्याला वाटे. त्यांना झालेला मुलगा रक्तदोषाने आजारी असे. झार निकोलस आणि झारिना अलेक्झांद्रा आपल्या मुलाच्या आजाराने खचले असताना एका सरदाराने रासपुतिनला झारकडे आणले. आश्चर्य म्हणजे त्याच्या उपचारांनी युवराजाच्या आजाराची तीव्रता कमी झाली. त्यानंतरही दोनवेळा रासपुतिनमुळे मुलाच्या आजारपणाला उतार पडलेला पाहून झार झारिना दोघेही प्रभावित झाले, रासपुतिनचे त्यांच्याकडे येणेजाणे वाढले. त्याची व्यसनाधिनता, व्यभिचार आणि रासवट भाषा याकडे झारला डोळेझाक करावी लागत होती. हळूहळू तो झारला राजकारणाबाबतही सल्ला देऊ लागला, लोकांच्या बढत्या, बदल्या, शिक्षा यामध्ये हस्तक्षेप करू लागला. त्यामुळे अधिकारी, उमरावही त्याची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करू लागले. वागणूक बेलगाम झालेला रासपुतिन उच्च कुळातील स्त्रियांचा उपभोग घेऊ लागल्यावर मात्र पंतप्रधान स्टोलीपीन याने त्याला हद्दपार केले. पुढे त्याचा खून झाला. हद्दपारीपूर्वी रासपुतिनने, आपला खून होणार असे भविष्य वर्तविले होते. त्याने झारला सांगितले होते की त्याचा खून जर झारच्या राजघराण्यातल्या माणसाने केला तर रशियन लोक झारच्या कुटुंबाला मारतील, र्निवश करतील. आश्चर्य म्हणजे त्याने वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे दोन वर्षांतच क्रांतीनंतर झार आणि त्याच्या कुटुंबाला ठार मारले गेले! नंतर कळले की रासपुतिनचा खून झारच्या चुलतभावाने केला होता! - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com