भारतात आणि इतरत्र आज जे कॅलेंडर मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते त्याला ग्रेगोरिअन कॅलेंडर म्हटले जाते. याशिवाय जगात इतरही काही कॅलेंडर वापरली जात होती आणि आहेत. एकाच वेळेला अनेक कॅलेंडर वापरात असल्याने अनेकदा गोंधळ उडण्याची शक्यता असते. विशेषत: एखादी खगोलशास्त्रीय किंवा इतिहासविषयक घटना घडली तर तिची नोंद कोणत्या कॅलेंडरप्रमाणे करावयाची असा प्रश्न पडतो. यावर तोडगा म्हणून जुलिअन डेट ही कालमापन पद्धत अस्तित्वात आली. आता साहजिकच प्रश्न पडतो की या मापनाची सुरुवात केव्हा झाली असे समजायचे. त्या साठी इ. स. पू. १ जानेवारी ४७१३ या दिवसाचे दु. १२.०० ही वेळ आरंभ िबदू निश्चित करण्यात आली आहे. हीच तारीख निवडण्याचे कारण म्हणजे जगातील काही कॅलेंडरची सुरुवात या दिवशी झाली आहे. तसेच मानवी इतिहासातील कोणत्याही ठळक घटनेची नेमकी नोंद या तारखेच्या पूर्वी झालेली नाही. आज जगात ग्रेगोरिअन पद्धत मोठय़ा प्रमाणावर वापरली जात असली तरी त्यातही वेगवेगळे काल - विभाग (ळ्रेी-९ल्ली२) वापरले जातात हे आपल्याला माहीत आहे. भारतात असा एकच विभाग असला तरी अमेरिकेत मात्र अनेक विभाग आहेत. आंतरराष्ट्रीय वार रेषा पार करताना आपल्याला एक दिवस कमी/अधिक करावा लागतो तो वेळेतल्या या फरकामुळेच. त्यामुळे खगोलशास्त्रातील संशोधनात एखादी घटना नोंदविताना किंवा आलेख काढताना जुलिअन डेट ही संकल्पना वापरली जाते. ही तारीख काढण्यासाठी आता आज्ञावली उपलब्ध आहेत. आपण ग्रेगोरिअन कॅलेंडरप्रमाणे आजची तारीख टाकली की लगेच जुलिअन डेट मिळते. उदा. १ डिसेंबर २०१६ दुपारी १२.०० (जागतिक वेळ) या क्षणाची जुलिअन डेट होती २४५७७२३.५ समजा २४ जानेवारी २०१७ यादिवशी दुपारचे १२ वाजून ५ मिनिटे झालेली आहेत. या क्षणाची जुलिअन डेट २४५७७७८.००२७८ इतकी असेल. या ठिकाणी जुलिअन वेळ असा शब्द न वापरता जुलिअन डेट असा शब्द वापरला आहे, कारण तसा प्रघात आहे. त्यामुळे जुलिअन डेट ही अपूर्ण आकडय़ात येऊ शकते. असे रूपांतर करून देणारी अनेक संकेत-स्थळे गुगलवर उपलब्ध आहेत. उपलब्ध आज्ञावली वापरून आपण उलट रूपांतरही करू शकतो. - डॉ. गिरीश पिंपळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org उमाशंकर जोशी : मानसन्मान ‘विश्वशांती’ या कवितेपासून १९३१ मध्ये लिहिलेल्या उमाशंकर जोशी यांच्या काव्य लेखनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर, काव्य, कथा, कादंबरी, काव्यात्म नाटय़रचना, नाटक, निबंधलेखन, समीक्षा, लेखन, अनुवाद, संपादन, संकलन, शोधग्रंथ अशा विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या उमाशंकर यांना ‘ज्ञानपीठ’सह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या प्रत्येक काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळालेले दिसतात.. ‘गंगोत्री’ कवितासंग्रहाला- ‘रंजीतराम सुवर्णचंद्रक’- हा गुजरातमधील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार(१९३६), पुढे ‘प्राचीन’ काव्यसंग्रहाला ‘माहिदा पुरस्कार’ (१९४४) , ‘प्रार्थना’ या काव्यसंग्रहासाठी ‘नर्मद सुवर्णचंद्रक पुरस्कार’ (१९४५); मग ‘महाप्रस्थान’ या काव्यसंग्रहासाठी ‘उमास्नेहराशी पुरस्कार’ (१९६६),‘अभिज्ञा’ काव्यसंग्रहाला ‘नानालाल पुरस्कार’ (१९६७), तर ‘कविनी श्रद्धा’ या साहित्य समीक्षा आणि निबंधाचे संकलन असलेल्या पुस्तकाला- ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ (१९७३) आणि १९६७ च्या ‘निशिथ’ काव्यसंग्रहाला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ (विभागून) असे मानसन्मान त्यांना मिळाले. गुजरात विश्वविद्यालयाने १९५४ मध्ये साहित्य आणि भाषा विभागाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली; साहित्य अकादमीचेही ते सदस्य झाले. १९५५ मध्ये त्यांची गुजराती साहित्य परिषदेच्या साहित्य विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ललित कला अकादमीचेही ते सदस्य होते. आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भाग घेण्यासाठी, भारत सरकारच्या शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान इ. देशांत ते गेले. कलकत्त्यात अखिल भारतीय लेखक संमेलनातील एका विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. उडिया लेखक संघाच्या ‘विष्णुव मिलन’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची निवड झाली. १९६१ मध्ये उमाशंकरजींना टागोर शतवार्षिकी संबंधात आयोजित आंतरराष्ट्रीय परामर्श परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. केंद्र सरकार नियुक्त भारतीय लेखकांच्या शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून ते सोविएट रशियाला गेले. १९६७ मध्ये ते गुजरात साहित्य परिषदेच्या दिल्ली येथे आयोजित २४ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. १९६६ ते १९७२ मध्ये गुजरात विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com