नियंत्रित खर्च आणि उत्पादन वाढ हे किफायतशीर व्यवसायाचे सूत्र असते. दुग्ध व्यवसायात प्रमुख खर्च गुरांच्या खाद्यावर (६५ ते ७० टक्के) आणि खरेदीवर (२० टक्के) होतो. तर मिळकत प्रामुख्याने दूधविक्रीतून (९० टक्के) होते. हा व्यवसाय करताना शास्त्रीय दृष्टिकोन आणि व्यापारी वृत्ती ठेवावी. जमाखर्च नोंदी, प्रत्येक गायीचे/ म्हशीचे दूध उत्पादन, दुभते दिवस, भाकड दिवस, आजारपण, प्रजननविषयक नोंदी ठेवाव्यात. यामुळे दूध उत्पादन खर्च काढता येतो. नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या गुरांचे संगोपन टाळून खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
दुधाळ गुरांचे संगोपन : दुधाळ जातींची जनावरे पाळल्यास दुग्ध व्यवसायात खात्रीने नफा मिळतो. विताच्या ३०० दिवसांत किमान २४०० लिटर दूध देणाऱ्या संकरित गायी, वितास किमान १८०० लिटर दूध देणाऱ्या मुरहा आणि मेहसाणा जातीच्या म्हशी यांचे संगोपन करावे.
दुधाळ गुरांचा कळप तयार होण्यासाठी सिद्ध वळूंच्या वीर्यमात्रांचा वापर करावा. कळपाच्या सरासरी दूध उत्पादनापेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी/ म्हशींचेच संगोपन करावे. मुरहा जातीच्या वळूंपासून म्हशींचा दुधाळ स्वरूपाचा कळप तयार करावा. दर्जेदार कालवडी/ पारडी संगोपनाद्वारे गुरे खरेदी खर्चावर नियंत्रण ठेवावे.
खाद्य व्यवस्थापन: दुधाळ गायी/ म्हशींना गरजेइतके सकस, समतोल खाद्य, चारा द्यावा. खाद्य कमी प्रमाणात दिल्यास खाद्य खर्चावर नियंत्रण येत नाही. उलट दूध उत्पादन कमी होऊन नुकसान वाढते. उसाचा वरचा पाला, पेंढा, गहू सरमड असे पोषणमूल्य कमी असणारे खाद्य दुधाळ गुरांना दिल्यास पोषण घटकांच्या (पिष्टमय घटक, प्रथिने, खनिज घटक) कमतरतेमुळे दूध उत्पादन घटते. गायी/ म्हशी माजावर येत नाहीत. गाभण राहत नाहीत. त्यामुळे भाकड कालावधी वाढून व्यवसायात नुकसान होते.
दुधाळ गुरांना शारीरिक पोषणासाठी प्रतिदिनी दोन किलो पशुखाद्य (खुराक) आणि प्रति तीन किलो दूध उत्पादनासाठी एक किलो पशुखाद्य लागते. हिरवी वैरण साधारणपणे प्रतिदिनी २० किलो आणि सुका चारा (कडबाकुट्टी/ सुके गवत/ पेंढा) पाच किलो लागतो. खुराक आणि वैरण देण्याचे प्रमाण वैरण उपलब्धतेनुसार निश्चित करावे.

जे देखे रवी.. – रसपूर्ण भाषा
शब्दाचे माहात्म्य मागच्या लेखात झाले; आता थोडा भाषेचा गाडा हाकतो. पंधराव्या अध्यायात। दाखवण्या प्रतिपदेची चंद्ररेखा। लागते वृक्षाची शाखा।। अशी ओवी येते. त्यात ती रेषेसारखी कोर अंधारातल्या झाडाच्या डहाळीमुळे उठून दिसते असा अर्थ. ही डहाळी खलनायक नाही. निसर्गात खलनायक नसतात. माणूस जातीत असतात. चंद्रकोरीचा प्रकाश जर अस्पष्ट असेल तरच ही डहाळी लागते. चांगुलपणाचे प्रमाण मंद झाले असेल तर मग जगातल्या वाईट गोष्टींना पुढे करून तो चांगुलपणाचा प्रकाश दाखवावा लागतो. हे माणसाच्या संस्कृतीत घडते. माणसाकडे भाषा असल्यामुळे एखादी गोष्ट स्पष्ट/ अस्पष्ट दाखवायची असेल तर मग तो रसपूर्ण भाषेत बोलतो. आधीच मर्कट तशात मद्य प्याला या रचनेने आपल्याला मनात हसू फुटते. राजहंस कर्दमी रूपाला या प्रतिमेने आपण नाही म्हटले तरी मनात विव्हळतो त्यात करुणा असते. युद्धाच्या आधीचे वातावरण दाखविताना पृथ्वीतळच जणू उलथले। आकाशाने आसूड ओढले। यात रौद्र रस दडला आहे. अर्जुनाला विश्वरूप दाखविल्यावर तो भेदरतो तेव्हा। आधीच आगीने वेढला। म्हणून समुद्राच्या आश्रया आला। तिथल्या लाटांनी आणखीनच भ्याला। यात भयानकता दडली आहे. महाभारतातले युद्ध सुरू व्हायच्या आधी योद्धय़ांच्या डोक्यात। शिरले वारे। धोपटून दंड। देऊ लागले हाकारे। यासारख्या ओवीत वीर रसाचा आविष्कार आहे. भाषाकारांनी बीभत्स रसही सांगितला, पण तो बाजूला ठेवू. हल्लीची वर्तमानपत्रे दुर्दैवाने याच रसाने भरावी लागत आहेत. पाश्चात्त्य संगीतातले आधुनिक मुखडे या बीभत्सपणाने नटलेले मी ऐकले आहेत. ते असो. रसांचा राजा असतो शृंगार रस. स्त्री-पुरुषामधल्या शारीरिक, भावनिक संबंधांना शृंगार म्हणण्याची पद्धत असली तरी शृंगार एखादी गोष्ट जास्त सुंदर दिसावी म्हणून करतात. मी गीतेवर असा दागिना चढवीन (ज्ञानेश्वरी) की कोण कोणाला शोभत आहे हे कळणार नाही, अशी ज्ञानेश्वरांची रचना आहे. शेवटी शृंगार अनुरूप असावा लागतो आणि ती अनुरूपता साकारणे फार अवघड. नाहीतर एकनूर आदमी, दसनूर कपडा असा प्रकार होतो. खरे तर आपण किंवा प्राणी किंवा वृक्ष हा निसर्गाचा शृंगार असतो. म्हणूनच वर म्हटले तसे निसर्गात काही कुरूप नसते. शृंगाराबद्दल ज्ञानेश्वरांची एक भारी ओवी आहे..
देखणीने दागिने न घालणं। हे मोकळ्या शृंगाराचे लक्षण।
पण तिने दागिने घालणं। हे तर फारच औचित्यपूर्ण।।
 यात दागिने न घालता निसर्गाने शृंगारलेल्या देहाचा संदर्भ आहे, पण हे सगळे रस झाले वस्तुमान असणाऱ्या गोष्टीबद्दल. चैतन्याचा रस कोणता, तर तो शांत रस. आणि तो शृंगाराच्या माथ्यावर बसला आहे, असे ज्ञानेश्वरांचे विधान आहे. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
Investing for tax benefit including SIP or Lump Sum Investment Multi asset fund filed by Mahindra Manulife print eco news
SIP अथवा एकरकमी गुंतवणुकीसह कर लाभासाठी गुंतवणूक; महिंद्रा मनुलाइफकडून ‘मल्टी ॲसेट फंड’ दाखल

वॉर अँड पीस-हर्निया : आंत्रवृद्धी
पुरुषांच्या जांघेतील हर्निया विकाराने ग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या आहे. या विकाराचा सामना एक काळ मलाही करावा लागला आहे. उदरवात, मलावरोध, पाचक अग्नीच्या ताकदीबाहेरचा आहार अशा छोटय़ा मोठय़ा कारणांनी पुरुषांच्या लहान आतडय़ाचा काही भाग; ‘आपली जागा सोडून जांघेत, किंवा अंडाशयात उतरतो.’ असा विकार स्त्रियांना होत नाही. या विकारात प्राथमिक लक्षणे किरकोळ.  खूप अवजड पदार्थ एकदम उचलले नाहीत; खूप जिने चढ-उतार केली नाही; पोटातील गॅस मोकळा होऊ दिला तर हर्नियाच्या प्राथमिक अवस्थेत रोगाला प्रतिबंध होऊ शकतो.
असा रुग्ण रिकाम्या पोटी उभे राहून तपासावा. आंत्रवृद्धीचा भाग, खोकला काढून वर सरकतो का, हे बघावे. वर सहजपणे जात असेल तर काही आयुर्वेदीय उपचार व नेमके पथ्यापथ्य पाळले तर शस्त्रकर्म टाळता येते; असे माझे अनुभाविक मत आहे. वर्षांनुवर्षे माझ्याकडे पुढील प्रकारच्या व्यवसायातील, प्रामुख्याने तरुण मंडळी हर्नियाच्या तक्रारी घेऊन येत असतात. वजन नित्य उचलावे लागणारे कामगार, बॉडीबिल्डर, धावपळीच्या शर्यतीत भाग घेणारे खेळाडू, दिवस-रात्र खूप जिने चढ-उतार करणारी पोस्टमन वा कुरिअर मंडळी, जेवणाच्या वेळेचा धरबंध नसणारी तसेच पचनाचा विचार न करता जडान्न हाणणारी खवय्या मंडळी, या मंडळींना हा विकार केव्हान केव्हा होतो. दोन्ही जांघांमध्ये दोनदोन वेळा या विकारामुळे त्रस्त होऊन शस्त्रकर्म करायला लागलेली खूप रुग्ण मंडळी मी पाहिली आहेत. या शस्त्रकर्मानंतर दोन दिवसांत रुग्ण नेहमीचे काम, दिनचर्या विनासायास करू शकतो. आंत्रवृद्धीची शंका आल्याबरोबर पुरुषाने रुंद पट्टीचा लंगोट दिवसा अवश्य वापरावा. सायंकाळी लवकर, कमी जेवावे, त्यानंतर किमान १५ मिनिटे फिरून यावे. पोटात गॅस होणार नाही असा आहार ठेवावा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, सिंहनाद, त्रिफळा, वातारी गुग्गुळ प्र. ३ दोन वेळा, जेवणानंतर सौभाग्यसुंठ, अम्लपित्तवटी व रात्री गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत- १४ ऑगस्ट
१९०८ > लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यां गोदावरी शामराव परुळेकर यांचा जन्म. साम्यवादी संघटनांसोबत काम करणाऱ्या गोदूताईंनी डहाणू परिसरातील आदिवासींच्या वेठमुक्ती-लढय़ाचे वास्तव मांडणारे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक लिहिले, तर ‘बंदिवासाची आठ वर्षे’ हे त्यांचे पुस्तक कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगते.
१९२५ > कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा ‘ठणठणपाळ’यांचा जन्म. वेधक आणि भेदकही निरीक्षणशक्ती, पात्रांचे तपशील मांडण्याची हातोटी ही त्यांची वैशिष्टय़े. चक्र, महानंदा, सारे प्रवासी घडीचे, स्वगत आदी २१ कादंबऱ्या, बॅरिस्टर, पुरुष, सूर्यास्त, दुर्गी अशी १९ नाटके, ‘लोक आणि लौकिक’, परममित्र ही प्रासंगिक लेखांची पुस्तके असे मोठे काम दळवींनी केले. माणसांची दु:खे आणि त्यामागल्या दडपल्या गेलेल्या भावना हे दळवींच्या लेखनाचे सूत्र होते. सप्टेंबर १९९४ मध्ये दळवी निवर्तले.
१९३६ > कवयित्री व लेखिका अंजली ठकार (पूर्वाश्रमीच्या प्रभा जुमडे) यांचा जन्म. तुलसीदल हा काव्यसंग्रह, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी यांची समओवी अनुलेखने व ‘उभी चढण सरेना’ ही कादंबरी ही त्यांची पुस्तके.
– संजय वझरेकर