मार्केटिंग एक भारदस्त आकर्षक शब्द. ग्राहकांशी सुसंवाद साधण्याचे प्रभावी माध्यम. ब्रँडची ओळख उच्चतम ठेवण्याच्या संकल्पाने उच्चतम ग्राहक सेवा प्रदान करण्याचं प्रमुख माध्यम. टेक्स्टाइल हा शब्द केवळ रोजच्या उपयोगातील वस्त्र प्रावरणाबरोबरच गणवेश असो की रुग्णालयातील कपडे, खेळाडू तसेच कारखान्यांसाठीची विविध कापडे याबरोबरच आता तंत्रोपयोगी वस्त्रे या सर्वाचा समावेश होतो. विणलेल्या कापडाबरोबरच गुंफलेली कापडेही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. तयार कपडय़ांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते .
वस्त्रोद्योग तसा आपल्या देशातला खूप प्राचीन म्हणायला हवा. भरघोस रोजगार पुरवणारा म्हणूनच याच्याकडे बघितलं गेलं. त्यानंतर बदलत्या काळास अनुरूप असे नूतनीकरण फारच थोडय़ा एकत्रित गिरण्यांनी केले. कालांतराने विकेंद्रित यंत्रमाग क्षेत्राने भरारी घेतली आणि एकत्रित गिरण्यांचा हिस्सा बघता बघता अल्पसा होत गेला. वाढता उत्पादन खर्चाचा ताण परवडेनासा झाला. सकृद्दर्शनी नूतनीकरणाचा अभाव हे कारण जरी वाटलं तरी जागतिकीकरणाने आयातीसही वाव मिळाल्याने आपल्या देशातील उत्पादने तशी स्पध्रेत न टिकणारी होत आहेत ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागते. त्यामुळे मूल्यवíधत उत्पादने निर्माण करण्याचा, नावीन्यपूर्ण मार्केटिंग करण्याचा, तयार कपडे उत्पादन करण्याचा विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे. तंत्रोपयोगी वस्त्रोद्योग विकसित करणे हा एक प्रभावी उपाय ठरू शकेल.
या उद्योगात प्रामुख्याने घाऊक बाजारपेठेचा उपयोग झालेला दिसतो. मुंबई आणि अहमदाबाद ही व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. मात्र गेल्या तीन-चार दशकांत देशातील विविध ठिकाणी उपघाऊक बाजारपेठा विकसित झाल्याने काही गिरण्यांनी थेट उपघाऊक व्यापाऱ्याद्वारे मार्केटिंग चालू केले. काही मोठय़ा कंपन्यांनी थेट किरकोळ विक्री सुरू केली. आता ई- मार्केटिंगचा जमानाही आला आहे. आपल्या देशातील मोठा मध्यम वर्ग आणि खर्चाला उपलब्ध असलेला वाढता पसा ही जमेची बाजू.
ग्राहकांच्या अभिरुची खूप बदलत आहेत. ग्रामीण आणि शहरी अशी दरी कमी होत चालली आहे. उत्तम गुणवत्तेकडे कल वाढत आहे. बघता बघता नावीन्यपूर्ण मार्केटिंग आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन ही आधुनिक काळाची गरज बनून गेली.
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-२२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – सावंतवाडी राज्यकारभार
राज्यकर्त्यां सावंत भोसले यांच्यामुळे सुंदरवाडीचे सावंतवाडी झाले. खेम सावंत तृतीयच्या काळात समुद्री चाचेगिरी आणि चोऱ्यामाऱ्या यांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे त्याने १८१९ मध्ये ब्रिटिशांचे आधिपत्य स्वीकारून त्यांची तनाती फौज राखली. सावंतवाडीच्या राज्यकर्त्यांनी पोर्तुगीज आणि पुढे कोल्हापूर राज्य, विजापूरचा आदिलशहा, कुडाळदेश, इंग्रज आणि शिवाजी महाराजांशी घेतलेल्या वैरामुळे सतत अस्थिरतेच्या भोवऱ्यात राहिले. त्यामुळे सावंतवाडी हे संस्थान आíथकदृष्टय़ा संपन्न आणि राजकीयदृष्टय़ा स्थिर कधीही नव्हते. चतुर्थ खेम सावंत राज्यकारभाराला लायक नसल्याने राज्यात बंडाळ्या माजल्यामुळे कंपनी सरकारने १८३८ साली पोलिटिकल सुपरिंटेंडेंट नेमला. १८४४ साली सावंत राजघराण्यातील लोकांचे बंड झाले त्यात स्वत: चतुर्थ खेम सावंत सहभागी झाला. सावंतवाडीच्या इतिहासात खेम सावंत पंचम ऊर्फ बापूसाहेब यांची राजवट (इ.स. १९१३-१९३७) अधिक लोककल्याणकारी ठरली. संस्थानाच्या अनेक देवस्थानांमध्ये देवाच्या सेवेकरी म्हणविल्या जाणाऱ्या देवदासी, भाविणी यांचे शोषण परंपरेच्या नावाखाली चालू होते. बापूसाहेब महाराजांनी देवदासीप्रतिबंधक कायदा करून ही प्रथा बंद पाडली. स्त्रियांसाठी त्यांनी स्वतंत्र शाळा, वसतिगृह, आरोग्यसुविधा देणाऱ्या संस्था, शासनसंस्थेत सहभाग सुरू केला. संस्थानातील प्रमुख व्यवसाय शेती हाच असल्याने त्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी बापूसाहेबांनी तलाव बांधून घेतले. सावंतवाडी संस्थानचे शेवटचे अधिकृत राजे शिवरामराजे भोसले यांची कारकीर्द इ. स.१९३७ ते १९४७ अशी झाली. कायदेशिक्षण आणि त्याचबरोबर सनिकी शिक्षणही घेतलेल्या शिवरामराजेंनी १९५७ ते १९७३ या काळात विधानसभेत सावंतवाडीचे प्रतिनिधित्व केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com