माणसाला प्राण्यांचे खेळ करण्याची आवड पिढीजात आहे. ही आवड कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक आहे. पण प्राण्यांचे खेळ करण्याची आवड मुळात माणसात निर्माण झाली ती कोणे एके काळी त्याच्या अन्नासाठी तो प्राण्यांची शिकार करी, त्यावरून सुचली असणार. त्या वेळचे प्राण्यांचे पळणे, त्याच्यापासून लपून रीहणे, त्यांच्या चेहऱ्यावरचे क्रूरतेचे, भित्रेपणाचे, लबाडपणाचे, खिन्नतेचे, शरण आल्याचे हावभाव पाहून तो चकित झाला असणार. ज्या गोष्टी माणसाला एकेकटय़ाला दिसल्या व त्या पाहून त्याला आनंद झाला, त्या गोष्टी इतर अनेकजणांना दाखवाव्यात असे त्याला वाटणे साहजिक आहे. मग तो घोडय़ांच्या, गाढवांच्या, बैलांच्या, कुत्र्यांच्या शर्यती लावू लागला. त्या निमित्ताने हे प्राणी माणसाळले. एकदा हे प्राणी माणसाळल्यावर त्यांच्याकडून चार खेळ करवून घेणे हे त्याला हळूहळू जमू लागले. हे जमल्यावर मग एकाच प्रकारचे प्राणी बाळगण्याऐवजी चार वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बाळगून त्यांचे खेळ करण्याची कल्पना त्याला आली आणि त्यातून सर्कशीचा जन्म झाला. सर्कशीत विदुषकांचे खेळ असतात, मृत्युगोलातील खेळ असतात, उंचावरून मारलेल्या उडय़ा असतात, पण सर्कशीचा प्राण असतो तो प्राण्यांच्या खेळात.
प्राण्यांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी करवून घेणे ही सुलभ गोष्ट नाही. कारण माणसासारखे प्राण्यांचेही वेगवेगळे मूड्स असतात. पुन्हा प्राणी केव्हा हिंस्र होतील हे सांगणे अवघड असते. प्राण्यांकडून खेळ करवून घेणाऱ्याला रिंग मास्टर म्हणतात. त्याच्या हातातील चाबकाच्या तालावर तो खेळ करून दाखवतो. प्रसंगी त्याला चाबकाची भीती दाखवून खेळ करून घ्यावे लागतात. पण हेही काही एका मर्यादेतच. प्राणी हिंस्र न बनता त्यांच्याकडून खेळ करवून घेणे कौशल्याचे काम असते. त्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या सवयी, मूड्स माहीत असणे गरजेचे असते. गवयाला जसा कार्यक्रम नीट व्हावा म्हणून रियाझ करावा लागतो, तसे या रिंग मास्टरला जे खेळ सर्कशीत दाखवायचे त्यांची तालीम प्राण्यांकडून रोज करवून घ्यावी लागते, तरच सर्कशीत खेळ करून दाखवता येतात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. उड जायेगा हंस अकेला..
नवल याचं वाटतं की, कुमारजींनी गायलेल्या कबीरांच्या निर्गुण भजनामधला शांत रस उत्कट कसा असतो? एखाद्या शांत सरोवराच्या नितळ पृष्ठभागावर सहज तरंगत जाणारा हंस अवचित आपले शुभ्र पंख पसरून हवेत उडून जातो. त्याच्या शुभ्र पंखांचं पाण्यावर क्षणकाळ प्रतिबिंब पडतं, पाण्यावर सूक्ष्म लहरी उमटतात आणि सारं पुन्हा स्तब्ध होतं. या दृश्य अनुभवानं मनात भक्ती उचंबळून येते आणि डोळ्यांतून नकळत पाझरते.
कुमारजी ‘हंस अकेला’ हे भजन म्हणताना मूळचा श्राव्य अनुभव पूर्णपणे मानसिक होतो आणि भजन संपता-संपता आध्यात्मिक होतो.
 वस्तुत: हे भजन ‘मृत्यू’संबंधी आहे. आत्म्यानं मनुष्य शरीराची कुडी सोडली आणि पार्थिवतेतून आत्मा अनंतात विलीन झाला. म्हटलं तर अतीव दु:खदायक प्रसंगाचं कबीरजी वर्णन करतात. त्यांची रचना कोमल असली तरी भाषा नेहमीप्रमाणे रोखठोक आहे.
यमके दूत बडे मजबूत
यमसे पडा झमेला
असं म्हणून ते मृत्यूमधली अपरिहार्य अगतिकता व्यक्त करतात; परंतु कुमारजींच्या स्वरांनी या शब्दांची अशी काही मांडणी केलीय की त्या घटनेमधली क्रूरता नष्ट होते. मरण अटळ आहे या भावनेने मनाचा थरकाप होण्याचं थांबतं. कबीरजी म्हणतात-
उड जायेगा हंस अकेला, जगदर्शन का मेला
जैसे पात गिरे तरुवरसे
मिलना बहुत दुहेला
ना जाने किधर गिरेगा
लगे या पवन का रेला
जब हुअे उमर पुरी
जब छुटेगा, हुकुम हुझुरी
यमके दूत बडे मजबूत
यमसे पडा झमेला
दास कबीर हरके गुन गावे
वह हर कोई पवन पावे
गुरुकी करनी गुरु जायेगा
चेलेकी करनी चेला
उड जाएगा हंस अकेला.
कबीरजी मोठय़ा हिकमतीने मृत्यूविषयी बोलतात. ‘जैसे पात गिरे तरुवरसे, जब हुए उमर पुरी’ असं म्हणताना वृद्धापकाळातल्या मृत्यूविषयी आपण बोलत नाही तर ज्याचं आयुष्य संपलं तो पुढे जातो असं म्हणतात.
अशा विषण्ण अनुभवाकडे ते तटस्थपणे पाहतात. ते म्हणतात, ही परमात्म्याची कहाणी आहे. मी तर फक्त ‘हरी’चे गुण गातो. त्या गुणगानामधूनच मला मन:शांती मिळते. माझं देवाशी भांडण नाही. ज्याच्या त्याच्या करणीने जो तो आपापलं आयुष्य जगतो. गुरू आपल्या कर्मानं आणि शिष्य त्याच्या कर्मानं जगतो नि मरतो.
मित्रा, खरंच कुमारजींच्या भजनातून मन प्रसन्न आणि पावन होतं. शांत होतं. आपण नकळत मनात डोकावतो आणि मनाच्या मानससरोवरात संथ तरंगत विहार करणारा शुभ्र हंस दिसतो.
तो शुभ्र असतो, कारण विशुद्ध असतो. त्याला कोणत्याही पाप, कुकर्माचा काळिमा लागलेला नसतो. निष्कलंक असणं हे त्या ऊर्जारूपी आत्म्याचं शुद्ध स्वरूप असतं.
तो शुभ्र पंखांचा हंस आपल्या मनात सापडतो, तोच मुक्तीचा अद्वैत क्षण. कबीरजी, कुमारजी यांचे शुभ्र हंस अनंतात विलीन झालेत, उरल्यात त्यांच्या स्मृती. मनाला प्रसन्न करणाऱ्या..
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
animals dying in mumbai zoo due to organ failure
वृद्धत्व, प्राणी-पक्ष्यांमधील झटापटी, अवयव निकामी झाल्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे मृत्यू

सफर काल-पर्वाची : व्हिएतनाम युद्धविराम
अमेरिकेसह  सर्व परकीय सैन्य जीनिव्हातील करारानंतर ६० दिवसांत व्हिएतनामच्या भूमीतून परत गेले. हो चि मिन्ह यांच्या उत्तर व्हिएतनामचे फ्रान्सच्या दक्षिण व्हिएतनामी सैन्याबरोबरचे युद्ध सन १९४६ ते १९५४ अशी आठ वर्षे चालले, तर अमेरिकेच्या पाठिंब्यावर असलेल्या दक्षिण व्हिएतनामी व अमेरिकन सैन्याबरोबर हो यांच्या सैन्याचे युद्ध सन १९५५ ते १९७५ असे २० वर्षे चालले. जगातील विसाव्या शतकातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या या युद्धात ठार झालेल्या सैनिकांची व व्हिएतनामी नागरिकांची संख्या खालीलप्रमाणे होती. ४५ हजार अमेरिकन सैनिक, एक लाख ८० हजार दक्षिण व्हिएतनामी, नऊ लाख उत्तर व्हिएतनामी, ७५ हजार फ्रेंच सैनिक. व्हिएतनामचे हे युद्ध जगातील पहिले पूर्णत: ध्येयवादासंबंधीचे युद्ध ठरले. व्हिएतनाममध्ये १९७५ साली शांतता प्रस्थापित होऊन दोन्ही भागांचे एकीकरण झालेले पाहायला राष्ट्रपिता हो चि मिन्ह मात्र हयात नव्हते. १९६९ साली हृदयक्रिया बंद पडून हो चि मिन्ह यांचा मृत्यू झाला. युद्धबंदी करारावर सह्या झाल्यावर हप्त्या-हप्त्याने संपूर्ण अमेरिकन सैन्य मायदेशी रवाना झाले. ३० एप्रिल १९७५ रोजी दोन्ही व्हिएतनामांचे एकीकरण झाले. एकीकरण झाल्यावर अखंड व्हिएतनामची राजधानी हनोई येथे केली गेली. सायगावचे नाव बदलून हो चि मिन्ह नगर असे केले गेले. या युद्धातील सहभागामुळे अमेरिकेची मात्र साऱ्या जगात नाचक्की झाली. व्हिएतनाम युद्धाचा शेवट होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन हे वॉटरगेट प्रकरणात अडकून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता व त्यांच्या जागी फोर्ड हे अध्यक्षपदी आलेले होते.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. ८ डिसेंबर
१८८० बंगालातील ख्यातनाम क्रांतिकारक जतिंद्रनाथ (यतिंद्रनाथ) उमेशचंद्र मुखर्जी यांचा कायाग्राम नदीया जन्म.  राष्ट्रीय शिक्षणाचे बालपणीच संस्कार झालेले असल्यामुळे देशप्रेम त्यांच्या अंगात ओतप्रोत भरलेले होते. राष्ट्रीय व क्रांतिकारी कार्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. शमशुल आलम (दरोगा) हत्येत त्यांना १९१० मध्ये अटक झाली होती. पुढे सुटका होताच हावडा षड्यंत्र केसमध्ये इंग्रज सरकारने  त्यांना वर्षभर डांबले. इंग्रजांचे जुलमी शासन उलथवून टाकणे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते. या ध्येयासाठी त्यांनी जपान, जर्मनी, अमेरिका, इंडोनेशिया येथून शस्त्रास्त्रे, दारूगोळा मागविला. १९१५ मध्ये जर्मनीतून आलेल्या जहाजाने ते ब्रिटिशविरोधातील शस्त्रास्त्रे गोळा करून आणण्यासाठी ओरिसात गेले असता इंग्रज हेर त्यांच्या मागावरच होते. कापटीतोडा येथे पोलिसांशी चकमकीत ते गंभीर जखमी झाले. १० सप्टेंबर १९१५ रोजी बालीखोर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला.
१९७८ इस्रायलच्या महिला पंतप्रधान आणि इस्रायलच्या प्रमुख संस्थापक सदस्यांपैकी एक गोल्डा मायर यांचे निधन.  रशियातील युक्रेनमध्ये जन्मलेल्या मायर पुढे १९४८ मध्ये रशियातच इस्रायलच्या राजदूत  झाल्या. १९६९ मध्ये त्या पंतप्रधान झाल्या. १९७४ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.
१९८८  दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in