‘हे बघ मानसी, मी आहे मुलखाचा आळशी. तेव्हा कळतं ते वळत नाही; हे मला कळतंय तरी वळत नाही. अगदी कळलं ते वळवायचं कसं? हे कळलं तरीही वळत नाही. म्हणजे मला वळवायचंच नाहीये; असं म्हणू नकोस. कारण मी आळशी आहे ना गं!’ मानस मानसीला म्हणाला.
मानसी मानसकडे रोखून बघतच राहिली. ‘मी तुझ्या युक्तिवादात लपलेली पळवाट शोधत्येय. आपण कसे मुलखाचे आळशीच आहोत. रोज व्यायाम केला पाहिजे, वाईट सवयी सोडल्याच पाहिजेत हे कळलेलं वळवता येत नाही. याची पावती आळशीपणावर फाडून स्वत:ची सुटका करून घेतल्याचे समाधान तुझ्या डोळ्यात दिसतंय!
मानसनं दीर्घ श्वास घेऊन म्हटलं, ‘तुम्ही मानसशास्त्रातले लोक येता-जाता सगळ्यांना अ‍ॅनलाइज करता. हे बघ, मी आळशी आहे. के लं ना..? मानसला मध्येच तोडत ‘केलं ना कबूल!’ असं म्हणायचंय ना तुला. मानसी म्हणाली.
स्वत:मधल्या दोषाची कबुली दिल्याचं सात्विक समाधान तुझ्या डोळ्यात दिसतंय. कबुली देऊन टाकायची, हो. अगदी प्रामाणिकपणे (म्हणजे तसा आव आणून) कबुली दिली. की आळशीपणा करायला पुन्हा मोकळा झाला. मानस सर्द होऊन मानसीकडे पाहात राहिला. ‘तू अशी बेचक्यात पकडतेस ना मला!’ तो म्हणाला.
मानसी एकदम हसली, हे बघ मानस, तुला खजील करायचा माझा इरादा नाही. पण काही गोष्टी लक्षात आल्या असतीलच तुझ्या! आपल्या प्रतिबिंबापासून तू काही लपवू शकत नाहीस. मानस, माझा मुद्दा निराळाच आहे रे! हे बघ, मला मुळातच ‘आळशी किंवा कसलंच लेबल लावलेलं आवडत नाही. कारण तुझ्या मनातला घोळ ‘तू स्वत:ला ‘आळशी’ हे लेबल लावण्यामुळे होतोय. एकदा एखादं लेबल विशेषकरून नकारात्मक लेबल कोणाला, अगदी स्वत:ला लावलं की कोणाकडेही नीट पाहाता येत नाही.
अशी लेबलं लावण्यात पालक एकदम पटाईत असतात. धांदरट, आळशी, बावळट म्हणून लेबल लावलं की ते अगदी आयुष्यभर टिकतं. गंमत म्हणजे धांदरट, आळशी वागण्याची आपल्याला मुभा मिळते. एनी वे, मी आहेच आळशी! तर आळशासारखंच वागणार!! असं आत्मसमर्थन करू लागतो. जणू काही वी लिव्ह अप टू द लेबल! तेव्हा मानस, स्वत:ला आळशी असं लेबल लावायचं सोडून दे. आपण तुझ्याकडे, म्हणजे तुझ्या कळतं पण वळत नाही या वर्तनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. तुझी अडचण नेमक्या शब्दात मांडू. त्यामुळे स्वत:मध्ये अचूक बदल करता येईल. उदा. माझ्या मनात पराभवामुळे उद्भवणाऱ्या नाराजीवर मात कशी करायची, हे समजलेलं नाही. म्हणजे स्वत:मध्ये बदल करायला एकदोनदा प्रयत्न करून जमलं नाही की मला चटकन निराश वाटतं. अशी निराशा माझ्यापुढचं आवाहन आहे. असं तू म्हण. तू डिप्रेशन चॅलेंज्ड आहेस.
मानस अवाक होऊन पाहात राहिला. ‘मानसी, तू अगदी मोजक्या आणि बिनचूक शब्दात माझा प्रश्न मांडलास. मला तुझं विश्लेषण शंभर टक्के पटलं. आणखी एक मुद्दा, ‘मला निराश होण्यावर काहीतरी उपाय सुचव ना!’
माझ्या डोक्यावर टपली मारून मानसी म्हणाली, ‘बघ आत्मचिंतन केलंस की नवे विचार सुचतील. आता या विचारांविषयी याच कट्टय़ावर बोलू..’

कुतूहल: पाणी शुद्धीकरण
पाणी हे मूलद्रव्य आहे असे पूर्वी समजले जात असे; परंतु १७८१ मध्ये ‘हेन्री कॅव्‍‌र्हेडिश’ यांनी ज्यात हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे प्रमाण २:१ आहे अशा मिश्रणात विजेची ठिणगी पाडली तर पाणी बनते, असे दाखविले. त्यानंतर विद्युत प्रवाहाने पाण्याचे अपघटन केले असता हेच वायू याच प्रमाणात निर्माण होतात. यावरून पाणी मूलद्रव्य नसून हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून बनलेले संयुग आहे, हे सिद्ध झाले.
असे हे पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मात्र नद्या, नाले, तलाव यांतील पाणी फक्त ०.०१% इतकेच आहे. तेसुद्धा प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यायोग्य नसते. वास्तविक पावसाचे पाणी सर्वात शुद्ध म्हणता येईल. मात्र जमिनीवर पडल्यावर त्यात क्षार, जैविक आणि अजैविक पदार्थ मिसळतात, जे आरोग्यास अपायकारक ठरू शकतात.  
मुंबई, पुणेसारख्या शहरांना पाणीपुरवठय़ासाठी मोठे तलाव आणि धरणे बांधावी लागतात. नागरिकांना पुरवण्याआधी हे पाणी पंपाने शुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते. पाणी आधी वाळूच्या थरांतून गाळून घेतात, जेणेकरून त्यातील न विरघळलेला जैविक आणि अजैविक कचरा वेगळा होतो. मग त्यात क्लोरिन मिसळून जीवाणू, विषाणू आणि तत्सम सूक्ष्मजीवांना मारून टाकतात. सर्वात शेवटी अ‍ॅक्टिव्हेटेड (ूं३्र५ं३ी)ि कार्बनच्या थरांतून गाळून त्यातील विरघळलेले वायू, क्षार, आणि जैविक घटक काढून टाकले जातात. असे पाणी पिण्यायोग्य समजले जाते.  
परंतु छोटय़ा गावात किंवा खेडय़ात अशी शुद्धीकरण व्यवस्था नसते. पाणी नदीतून, विहिरीतून अथवा कूपनलिकासारख्या स्रोतातून मिळवावे लागते. तेव्हा पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्ला दिला जातो. तुरटी किंवा आयर्न क्लोराइड हे गाळ खाली बसायला मदत करतात. स्वच्छ आणि जाड कापडातून पाणी गाळून घ्यावे लागते. मग क्लोरिनच्या गोळ्या किंवा पोटॅशियम परमँगनेट टाकून र्निजतुकीकरणाला वेळ द्यावा लागतो. परंतु पाणी १०-१५ मिनिटे उकळून घेणे केव्हाही उत्तमच. काही ठिकाणी लाकडाच्या किंवा नारळाच्या काथ्याच्या कोळशातून पाणी गाळून घेतात. जेणेकरून त्याचा वास आणि रंग निघून जातो.  
डॉ. कमलेश कुशलकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व: जात्यहंकार, जातिमत्सर आणि जातिकलहाचा क्षय!
‘‘आपल्या हिंदू राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाशी प्रथम चातुर्वण्र्य आणि नंतर त्याचेच विकृत स्वरूप असलेली जातिभेद संस्था ही इतकी निगडित झालेली आहे की, आपल्या हिंदू या आर्य राष्ट्राच्या वैशिष्टय़ाची व्याख्या काही काही स्मृतिकारांनी ‘चातुर्वण्र्यव्यवस्थानं यस्मिन् न विद्यते, त म्लेंच्छदेशं जानीयात् आर्यावर्त तत: परम्’ अशीच दिलेली आहे. अर्थात आपल्या हिंदू राष्ट्राच्या उत्कर्षांचे श्रेय जसे या आपल्या जीवनाच्या तंतूतंतूशी गुंफून राहिलेल्या जातिभेदास असण्याचा उत्कट संभव आहे; तसाच आपल्या राष्ट्राच्या अपकर्षांचेही तीच संस्था एक बलवत्तर कारण असण्याची तितकाच उत्कट संभव आहे. त्यातही मूळचे चातुर्वण्र्य जे गुणकर्म विभागश: सुष्टम् ते लोपत जाऊन आजच्या जन्मनिष्ट जातिभेदाचा फैलाव होऊ लागला त्याच वेळी तसाच आपल्या हिंदुस्थानाचा अध:पातही होत आला; आणि ज्यावेळी बेटीबंद आणि रोटीबंद जातिभेदाने अत्यंत उग्र स्वरूप धारण केले तोच काळ आपल्या अध:पाताचाही परमावधी करणारा ठरला.’’ अशी जातिभेदाची इष्टानिष्टता सांगत त्यामुळे होत असलेल्या समाजदुहीचे स्वरूप स्पष्ट करताना स्वा. सावरकर पुढे म्हणतात -‘‘या समकालीनतेमुळे तर त्या जातिभेदाचा आणि त्या अध:पाताचा संबंध केवळ काकतालीय योगाचा आहे की कार्यकारण भावाचा आहे याची शंका अत्यंत उत्कटतेने न येणे केवळ अशक्य आहे. यामुळे आपल्या राष्ट्राच्या अपकर्षांची कारणे शोधताना इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच या जातिभेदाच्या प्रस्तुतच्या स्वरुपाच्या इष्टनिष्टतेची छाननी करणे हे भारतीय राष्ट्रधुरीणींचे आजचे एक अत्यंत त्वर्य (व१ॠील्ल३) आणि अपरिहार्य कर्तव्य झालेले आहे.. ब्राह्मण मराठय़ांचे ब्राह्मण बनू पाहतात. मराठे महारांचे ब्राह्मण बनू पाहतात, महार मांगांचे ब्राह्मण बनू पाहतात! हे जातवेडे एका ब्राह्मणाच्याच अंगी मुरलेलें नसून अब्राह्मण चांडालापर्यंत उभ्या हिंदुसमाजाच्या हाडीमासी रुजलें आहे! उभा समाजदेह या जात्यहंकाराच्या, या जातिमत्साराच्या, जातिकलहाच्या, क्षयाचे भावनेने जीर्णशीर्ण झालेला आहे.