कुठल्याही वनस्पतीचे मोठय़ा प्रमाणात संकलन करण्यापूर्वी जिल्ह्य़ाचे उपवनसंरक्षक आणि राज्य बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या संकलनाचे हेतू वेगवेगळे असू शकतात. कधी एकाच मोहिमेत एखाद्या विशिष्ट वनस्पतींचे संकलन, तर कधी एकाच मोहिमेत अनेक वनस्पतींचे संकलन हे नोंदी ठेवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी केले जाते.
वरील दोन्ही प्रकारांत वनस्पतींची उपलब्धता, त्यांचा ठावठिकाणा व त्या ठिकाणच्या त्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण (दुर्मीळ किंवा विपुल) याची पूर्ण माहिती व अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. बहुधा, प्रत्येक वनस्पतीचे गरजेनुसार व उपलब्धतेनुसार कमीत कमी ३-५ नमुने गोळा केले जातात आणि म्हणूनच हे नमुने गोळा करणारी व्यक्ती जाणकार असणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा दुर्मीळ वनस्पतींचा नायनाट होणार हे निश्चित.
वनस्पतींची नोंदणी करण्याची संकल्पना इटलीमधील बोलॉग विद्यापीठात प्राध्यापक लुका गिनी यांनी प्रथम (१४९०-१५३६) सुरू केली. युरोपमध्ये १७०७ ते १७७८ च्या दरम्यान ही पद्धत वापरल्याचे आढळते. भारतात ही पद्धत प्रथम इंग्रजांनी आणली. १७५३ मध्ये हावडा येथे डॉ. विलियम रॉक्सबर्ग यांनी सेंट्रल नॅशनल हब्रेरियमची सुरुवात केली.
नमुने गोळा करण्यासाठी काही हत्यारे, वस्तू बरोबर असाव्यात. उदा. छाटणी करण्यासाठी सिकेटर, एखादी वनस्पती मुळापासून काढण्यासाठी ट्रॉवेल, वनस्पतींची छाटणी केल्यानंतर त्यांना ताजे ठेवण्यासाठी व्हॅस्कुलम किंवा गॅल्व्हॅनाइज्ड पत्र्यांची पेटी, पॉवरची छोटी लेन्स, टिपकागद, अध्र्या आकाराचे जुने वर्तमानपत्र. नोंद ठेवण्यासाठी वही, नमुन्यांवर बांधण्यासाठी नोंदणी क्रमांकाचे टॅग, लहान आकाराच्या वनस्पतींना तात्पुरत्या ठेवण्यासाठी छोटय़ा प्लॅस्टिकच्या पिशव्या, सुतळी किंवा दोरी, कार्डबोर्डचा प्रेस, २% फॉर्मलिन. तीव्र फॉर्मलिनच्या प्रक्रियेमुळे वनस्पतींचा मूळ रंग जाऊन फांदी, फुले अथवा पाने काळी अथवा पिवळी पडतात हे ध्यानात ठेवावे, त्यामुळे ते सौम्य स्वरूपाचे असावे. पिण्याच्या पाण्याची बाटली, अन्नपाकिटे आणि आणीबाणीच्या वेळी लागणारी औषधांची पेटी इत्यादी साहित्याची पूर्वतयारी करून वनस्पती संकलन करण्याच्या मोहिमेवर निघावे.
डॉ. राजेंद्र शिंदे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नगराख्यान – प्रोटेस्टंट लंडन
लंडनमधील गिल्ड पद्धतीमुळे व्यापार वाढून संपन्न झालेले व्यापारी लढायांना पसे पुरवीत, राज्यकर्त्यांना कर्जाऊ पसे देत आणि करांमध्ये सवलती उकळत. गिल्ड्सच्या रूपाने राजसत्तेला तुल्यबळ असे नवीन सत्तास्थान उदयाला आले. नवव्या शतकात अल्फ्रेड द ग्रेटने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पुढे तो राजधर्म म्हणून स्वीकारला. कॅथलिक पंथाचा पूर्ण पगडा इंग्लंडवर पडल्यावर अचानक त्याला मोठा धक्का बसला. आठव्या हेन्रीला स्वतची बायको जिवंत असताना दुसरे लग्न करायचे होते. पोप या लग्नाला परवानगी आणि मान्यता देईना. मग हेन्रीने १५३४ साली इंग्लंडपुरती स्वतंत्र धर्मसत्ता स्थापून कॅथलिक पंथाला काडीमोड दिला. त्यानुसार इंग्लंडचा राजा हा प्रोटेस्टंट पंथीय चर्च ऑफ इंग्लंडचा कायमचा नियंत्रक झाला.
पुढे सतराव्या शतकात लंडनच्या पार्लमेंटने कॅथलिक ख्रिश्चन राजा गादीवर येण्यासच बंदी घातली. सोळाव्या शतकाच्या मध्यावर आठव्या हेन्रीची मुलगी एलिझाबेथ प्रथम ही राणी अत्यंत चाणाक्ष निघाली. तिच्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत लंडन-इंग्लंडचे आरमारी वर्चस्व वाढले, इ.स. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. याच काळात शेक्सपियर हा इंग्लिश लेखक प्रसिद्ध नाटककार म्हणून उदयाला आला. लंडनचा व्यापार, विस्तार होऊन ते वैभवशाली शहर बनले.
राणी एलिझाबेथ जन्मभर अविवाहित राहिली. तिच्यानंतर आलेला चार्ल्स प्रथम हा स्वतला देवाचा अंश मानून त्याने मनमानी कारभार सुरू केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com