आयुष्याची कोणतीच हमी नसते; ते केवळ एक खुलत जाणं असतं, काहीसं अस्ताव्यस्त खुलत जाणं. तुम्ही स्वत:भोवती एखादं छोटंसं घर बांधू शकता, सुरक्षिततेसाठी, पण नंतर ते घर म्हणजे तुमचं थडगं होऊन जातं. त्यापेक्षा आयुष्यासोबत जगा. लग्न ही मानवाने निर्माण केलेली संस्था आहे; प्रेम आयुष्याचा भाग आहे. तुम्ही सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रेमाभोवती लग्नाची गुंफण करता. जे होणं कधीच शक्य नाही, ते तुम्ही करत आहात, प्रेमाला कायद्यात बांधू पाहत आहात. तुम्ही काही तरी अशक्य असं करण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नात, प्रेम मरून गेलं तर त्यात आश्चर्य ते काय? तुमचा नवरा होतो; तुमच्या प्रेयसीची बायको होते. तुम्ही आता दोन जिवंत व्यक्ती उरतच नाही, तुम्ही दोन यंत्रणा होऊन जाता. नवऱ्याची निश्चित अशी करय आहेत, बायकोचीही निश्चित अशी करय आहेत; दोघांनी काही निश्चित अशी कर्तव्यं पार पाडायची आहेत. आयुष्याचा प्रवाह गोठून गेलाय. बघा जरा नवरा आणि बायकोकडे. तुम्हाला कायम दोन गोठलेल्या व्यक्ती दिसतील, एकमेकांशेजारी बसलेल्या, आपण नेमकं काय करतोय, इथे का बसलोय हेच कळत नसल्यासारख्या. कदाचित त्यांना कुठे जायला वावच नाहीये. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये प्रेम असतं, तेव्हा त्या एका वलयात जगत असतात, सतत वाटून घेत असतात. त्यांची स्पंदनं एकमेकांपर्यंत पोहोचत असतात; त्यांचं अस्तित्व ते एकमेकांवर उधळत असतात. त्यांच्यात कोणतीही भिंत नसते, ते दोघं असतात आणि नसतातही- ते एक झालेले असतात. नवरा आणि बायको एकमेकांपासून शक्य तेवढे दूर असतात, ते एकमेकांच्या शेजारी बसलेले असले तरी. बायको काय म्हणतेय हे नवरा कधीच ऐकत नाही. तो खूप काळापूर्वीच बहिरा झालाय. नवऱ्याबाबत काय घडतंय हे बायको कधीच बघत नाही. ती त्याच्यापुरती अंध झालेली आहे. ते एकमेकांना पूर्णपणे गृहीत धरतात. ते आता व्यक्ती उरलेच नाहीयेत. कारण व्यक्ती कायम अनिश्चित असतात, व्यक्ती कायम बदलत असतात. आता त्यांच्याकडे निश्चित भूमिका आहेत निभावण्यासाठी. त्यांचं लग्न झालं त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून ते कधी जगलेच नाहीयेत. लग्न करू नका, असे मी म्हणत नाहीये, पण प्रेम ही खरी गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. ते मेलं तर लग्नही निर्थकच आहे. आणि हे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला लागू पडतं, प्रत्येक गोष्टीला. एक तर तुम्ही ते जगू शकता-पण मग तुम्हाला या दुविधेत जगावं लागेल. पुढच्या क्षणाला काय होणार हे माहीत नाही अशा दुविधेत-किंवा तुम्ही सर्व काही निश्चित करून टाकू शकता. काही लोक प्रत्येक बाबतीत इतके निश्चित असतात की त्यांना आश्चर्याचा धक्का कधीही बसत नाही. पण मी जे काही आता सांगणार आहे ते अगदीच अविश्वसनीय आहे- ते म्हणजे तुम्ही देव आहात. तुम्ही हे विसरून गेला आहात. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो : हार्वे फायरस्टोन, थॉमस ए. एडिसन, जॉन बरोज आणि हेन्री फोर्ड हे हिवाळ्यासाठी फ्लोरिडाला जात असताना ग्रामीण भागातल्या एका सव्र्हिस स्टेशनवर थांबले. ‘आम्हाला आमच्या हेडलाइट्ससाठी काही बल्ब्ज हवे आहेत’, फोर्ड म्हणाले. ‘आणि गाडीत माझ्या बाजूला बसलेत ते आहेत थॉमस एडिसन आणि मी हेन्री फोर्ड.’ सव्र्हिस स्टेशनवरच्या माणसाने त्यांच्याकडे बघितलंही नाही, काहीशा उर्मटपणाने तंबाखूची पिचकारी टाकली. फोर्ड म्हणाले, ‘आम्हाला नवीन टायरही विकत घ्यायचा आहे, तुमच्याकडे फायरस्टोन टायर्स असतील तर. आणि ते खुद्द हार्वे फायरस्टोनही आमच्या गाडीतच आहेत.’ तरीही तो म्हातारा मनुष्य काहीच म्हणाला नाही. तो चाकावर टायर बसवत होता, तेव्हा लांब पांढरी दाढी असलेले जॉन बरोज खिडकीतून डोकं बाहेर काढत म्हणाले, ‘तू हे कसं करतोहेस, बाबा?’ अखेरीस त्या सव्र्हिस स्टेशनवरच्या त्या म्हाताऱ्या माणसाने बरोज यांच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघितले आणि तो म्हणाला, ‘आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सांताक्लॉज आहात तर मी हा पाना तुमच्या डोक्यात घालेन.’ हार्वे फायरस्टोन, थॉमन ए. एडिसन, जॉन बरोज आणि हेन्री फोर्ड एकाच गाडीतून प्रवास करू शकतात यावर त्याचा विश्वासच बसला नाही. ते चौघे मित्र होते आणि एकत्र प्रवास करायचे. तुम्ही देव आहात, असं मी म्हणतो तेव्हा तुमचा विश्वास बसत नाही. कारण, तुमच्यात कोण प्रवास करतंय, तुमच्यात कोण बसलंय, कोण माझं ऐकतंय हे सगळं तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात. तुमच्यावर बाहेरून काही लेबल्स चिकटवली गेली आहेत आणि ते तुमचं नाव, धर्म, राष्ट्र आहे यावर तुम्ही विश्वास ठेवलाय. हे सर्व खोटं आहे! तुम्हाला तुमचं स्वत्व माहीत नसेल, तर तुम्ही हिंदू, ख्रिश्चन किंवा मुस्लीम आहात याला काहीच अर्थ उरत नाही. या सगळ्या लेबलांना निश्चित अशी उपयुक्तता आहे, त्यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. तुमचं असणं म्हणजे केवळ तुमचं अस्तित्व आहे. या विशुद्ध अस्तित्वालाच मी देव म्हणतो. तुम्हाला तुमच्या आतलं देवत्व कळलं, तर तुम्हाला आयमुष्य म्हणजे काय तेही समजेल. अन्यथा तुम्हाला आयुष्याचा अर्थच लावणं शक्य होणार नाही. हाच संदेश आहे. संपूर्ण आयुष्य सातत्याने एकाच गोष्टीकडे निर्देश करत असतं- ती म्हणजे तुम्ही देव आहात. ते एकदा का समजलं म्हणजे मृत्यू ही संकल्पनाच उरत नाही. तेव्हा तुम्ही धडा शिकलेले असता. मृत्यू म्हणजे देवांचं स्वगृही परत जाणं. रब्बी बर्नहॅम अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांच्या पत्नीला रडू आवरले नाही. ते म्हणाले, ‘तू कशाला रडतेस? माझं अवघं आयुष्य मी ही एकच गोष्ट शिकत होतो- मरावं कसं, ही!’ हे संपूर्ण आयुष्य.. हे पुन्हा घरी कसं जावं याचं प्रशिक्षण असतं केवळ, मृत्यूला कसं कवटाळावं, कसं नाहीसं व्हावं. कारण ज्या क्षणी तुम्ही नाहीसे होता, देव तुमच्यात प्रकट होतो. तुमचं असणं म्हणजे देवाचं नसणं; तुमचं नसणं म्हणजे देवाचं असणं. सौजन्य -ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन www.osho.com - भाषांतर - सायली परांजपे