जगणं खरंच बदललं

‘जगणं बदलताना’ या अपर्णा देशपांडे यांच्या सदरातील ‘बाल म्हणोनी कोणी’( ६ फेब्रुवारी) हा लेख आवडला. हल्ली लहान मुलं फार सफाईने गॅजेट्स वापरतात.  त्यांचे सगळ्यांना येणारे अनुभव अपर्णा यांनी  रंजकपणे सांगितले आहेत. त्याबरोबर या अतिशय हुशार असणाऱ्या लहानग्यांचं बालपण व निरागसता जपली पाहिजे. त्याची जबाबदारी पालकांची व समाजाची आहे हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. या सदरानं आम्हा वाचकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. ‘जगणं बदलताना’ ही संकल्पनाच मस्त आहे. सर्वच गोष्टी वेगाने बदलत आहेत. इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन खाणं व वस्तू मागवणं सुलभ झालं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे ज्येष्ठांचं जगणं कसं बदलतं त्याविषयी  टेक्नोसॅव्ही ज्येष्ठांचा मला भावलेला हा संवाद –  ‘आज मी जेवायला काही करणार नाहीये,’’  शोभा आजी म्हणाल्या, ‘‘मी  मस्त पुस्तक वाचते आहे. ते मी आज रात्रीपर्यंतच संपवणार आहे.’’  नाना आजोबांनी स्मार्टफोनवरून पटापट ऑर्डर केली. ते म्हणाले,‘‘मी ऑनलाइन ऑर्डर केली आहे. पुरणपोळ्या, मसालेभात, छोटे बटाटे वडे आणि तुझी आवडती सोलकढी. अर्ध्या तासात येईल.’’ आजी खूश झाल्या. नाना म्हणाले, ‘‘उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळेच साडेचारचं नाटक मी ऑनलाइन बुक केलं आहे. आता मी  टॅक्सी बुकिंगही शिकून घेतलं आहे. त्यामुळे उद्या आपल्याला नाटकाला जाताना काही अडचण येणार नाही. पण काय गं, तू पण काही कॉम्प्युटरमधल्या गोष्टी शिकणार होतीस ना?’’ आजी हसल्या. म्हणाल्या,‘‘मी झूम कॉल करणार आहे उद्या. आपल्या दोन्ही लेकी, जावई व नातू, नाती बरोबर. आपल्या सगळ्यांना एकत्र गप्पा मारता येतील.’’ नाटक सुरू होण्याची वाट बघत असताना आजी म्हणाल्या, ‘‘मी एका अ‍ॅपवरून ब्युटिशियन केस कलर करण्यासाठी बोलावली होती. पण शेजारच्या चाळीतील मीरा माझे केस कापायला व कलर करायला येते ते मला जास्त आवडतं. तिला पैशांची गरज आहे. ती येणार असेल तर तिच्यासाठी मी कधी छान पदार्थ बनवून ठेवते, आमच्या गप्पा होतात आणि मनालाही बरं वाटतं.’’ नाना म्हणाले, ‘‘खरं आहे. बँकेत, किराणा, औषधे इत्यादी आणायला दुकानात गेलं तर चालण्याचा व्यायाम, चार लोकांशी बोलणं होतं. वेळही चांगला जातो. आता कॉम्प्युटर, इंटरनेट, स्मार्टफोन मधल्या नवीन गोष्टी समजल्या. त्यामुळे मी आजारी असलो किंवा दमणूक झाली तर हे पर्याय चांगले आहेत.’’ पण प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याचा पर्याय ज्येष्ठांसाठी अधिक योग्य, यावर आजी—आजोबांचं  एकमत झालं. मात्र झूम/ व्हिडीओ कॉल यामुळे प्रत्यक्ष भेटता नाही आलं तरी बघता, बोलता येतं. टॅक्सी बुकिंग करायला जमल्यावर त्यांचं नातलग, मित्राकडे जाणं वाढलं, नाटक सिनेमा बघणं वाढलं. हे आजींचं म्हणणं नानांना पटलं होतं.

संध्या सिनकर, ठाणे</p>

मनाला भावलेला लेख

‘आपणच आपले व्हॅलेंटाईन’ हा योगेश शेजवलकर यांचा लेख

(१३ फेब्रुवारी) वाचला. लेखकानं वाचकांना दिलेला सल्ला, आपणच आपले व्हॅलेंटाईन बनण्याचा प्रयत्नही नक्की करा !.  एकदम हृदयाला स्पर्शून गेला आणि फार पूर्वीचं  जग्विख्यात शिल्प डोळ्यांसमोर उभं ठाकलं. एक ओबडधोबड पाषाण, त्यावर दोन हात,   एकात छिन्नी आणि दुसऱ्यात हातोडी. दोन्ही हात त्या पाषाणाला घडवत आहेत आणि डोक्यापासून गळ्यापर्यंतचा  सुंदर भाग साकारतोय. असं काहीसं ते शिल्प होतं.  हे अगदी खरं नाहीये का? ज्या वेळेस आपणच आपले शिल्पकार होऊन आपले जीवनशिल्प घडवत राहू तेव्हा मग आपलं जीवन समृद्ध व्हायला काहीच वेळ लागणार नाही. हेच तर नाही का ‘आपणच आपले व्हॅलेंटाईन बनणं?’ लेख वाचत असताच प्रसिद्ध हिंदी कवी भवानी प्रसाद मिश्र यांच्या कवितेच्या ओळी  रुंजी घालू लागल्या , ‘कुछ लिखके सो, कुछ पढके सो. जिस जगहसे तू जागा है, उस जगह से कुछ आगे बढके सो.’ ( कवी माणसाला उद्देशून सल्ला देतोय- रोज काही तरी लिहून आणि वाचून झोप. ज्या जागेवर तू उठलायंस, त्या जागेवरून किमान काही तरी पुढे सरकून – आपलं जीवन काही तरी ‘बेहतर’ करून झोप.)  स्थळ, काळ, वय, असं काहीही आड न येऊ  देता जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर जीवनाला नवीन तरारी देणारे लेख ‘लोकसत्ता’त वाचायला मिळतात आणि म्हणूनच शनिवार- रविवारच्या ‘लोकसत्ता’ ची आतुरतेने वाट पाहात असतो.

– विनोद द. मुळे, इंदौर (मध्य प्रदेश)