विनायक जोशी यांच्या ‘स्वरभावयात्रा’ या सदरातील ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या गीतासंबंधीचा लेख वाचला. लेखात शेवटी जीवन-मरणाच्या मफलीत वन्स मोअर का घेता येत नाही, असा मार्मिक प्रश्न लेखकाने केला आहे. खरोखरच हे गीत काळजाचा इतका ठाव घेणारे आहे, की ते ऐकून कुणालाही हा प्रश्न पडेल. व्यक्ती गेल्यावर कितीही टाहो फोडला तरी ती परत येत नाही, हे सर्वच जाणतात, तरी पण ‘याल का हो बघायाला?’ हे कवी पी. सावळाराम यांचे शब्द लतादीदी ज्या आर्ततेने हृदयापर्यंत पोहोचवतात त्याला तोड नाही. या लेखातील ‘वन्स मोअर’ हा शब्द वाचून अनेक वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते, की या गीताचे ध्वनिमुद्रण झाल्यावर वसंत प्रभूंना आणखी चांगल्या इफेक्टसाठी एक रिटेक घ्यावासा वाटला होता. पण तशी सूचना त्यांनी करताक्षणी लतादीदींनी आपला चेहरा ओंजळीत लपवून ‘हे मला परत गायला सांगू नका,’ असे म्हटले होते. तसेच हे गीत त्यांनी नंतर कोणत्याही ठिकाणी परत गायलेले नाही. या गीतावरून ‘घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला, बारा मास सहा ऋतू अíपती वर्षमाला’ हे गीत आठवले. हेही पी. सावळाराम यांचे आणि वसंत प्रभू यांनीच संगीतबद्ध केलेले गीत. त्यातील ‘सोडा आता उपवास, लेक झाली मिळवती’ हे शब्दही मा. दीनानाथ आणि लतादीदी यांच्या संदर्भातील असावेत असे वाटते. ही गीते पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू या त्रयीने अजरामर केली आहेत यात शंका नाही. - मुकुंद नवरे, मुंबई.