वाडा: गालतरे येथील ‘गोवर्धन इको व्हिलेज’ या आध्यात्मिक संस्थेने नैसर्गिक नाला बुजवून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येऊन रस्ता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती गालतरे परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कंचाड- गोऱ्हे- गालतरे हा वाडा तालुक्यातील प्रमुख रस्ता आहे. जवळपास १५ किलोमीटर लांब अंतराचा असलेल्या या रस्ताचा वापर या परिसरातील १७ हुन अधिक गांव, पाडय़ांतील हजारो नागरिकांच्या रहदारीसाठी महत्वाचा आहे. गालतरे गावाजवळ या रस्त्यालगत ‘गोवर्धन इको व्हिलेज’ ही एक मोठी आध्यात्मिक संस्था गेल्या अनेक वर्षांंपासून कार्यरत आहे. या संस्थेचे या ठिकाणी शंभर एकरहुन अधिक जागेत विविध सामाजिक, आध्यात्मिक प्रकल्प सुरू आहेत. अलिकडेच या संस्थेने येथील एका नैसर्गिक नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधल्याने पाण्याचा प्रवाह अडला जाऊन तो रस्त्यावर आला आहे.

अलिकडेच झालेल्या चक्री वादळामुळे दोन दिवस कोसळलेल्या पावसाचे पाणी या संरक्षक भिंतीमुळे अडले जावून येथील मुख्य रस्त्यावर आले. पावसाळ्यात या प्रवाहाच्या पाण्याने  हा रस्ता तुटून जाऊन या रस्त्यावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे, गालतरे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान या ठिकाणी गोवर्धन संस्थेने कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक नाला बुजवलेला नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह अडला जात नाही, तर या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरील मोरी लहान असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो असे गोवर्धन संस्थेचे सुरक्षा अधिकारी अरविंद पाटील यांनी सांगितले.