|| निखिल मेस्त्री

पाच जणांचा मृत्यू, रुग्णांना खबरदारी घेण्याची सूचना

पालघर : पालघर जिल्ह्यात  म्युकरमायकोसिसचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दगावलेले पाचही रुग्ण वसई तालुक्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पालघर जिल्ह्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.  नियंत्रण शल्यचिकित्सक कार्यालयाने म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती दिली असली तरी मूळचे पालघर जिल्ह्यातील पण जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व करोना उपचार केंद्रांमध्ये व्याधी असलेल्या व म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या बाधित रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीत कोणालाही अजूनही म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली नसल्याचे म्हटले  आहे.  ज्या करोना बाधित रुग्णांना दहा दिवसांहून अधिक काळ प्राणवायूवर ठेवले गेले आहेत असे रुग्ण, मधुमेही, करोनाबाधित रुग्ण, अवयवांचे विकार असलेले रुग्ण, डायलिसिसवर असलेले रुग्ण यांची पहिल्या टप्प्यात म्युकरमायकोसिसची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या व्याधींसोबत ज्या रुग्णांना डोळे दुखणे, त्यातून पाणी गळणे, अर्ध चेहरा दुखणे, नाकातून सतत पाणी वाहणे अशी लक्षणे आढळत आहेत,  अशांचीही तपासणी करण्यात येत आहे.  आतापर्यंत सोळा रुग्णांना बुरशी प्रतिबंधात्मक इंजेक्शन (अ‍ॅम्पोट्रीझीम-बी) देण्यात आली आहेत.  इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

इंजेक्शनचा काळाबाजार

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे काहींकडून सांगण्यात येत आहे. काळाबाजारी करणारे काही दलाल सक्रिय आहेत असे समजते. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अशाच दोघांना ठाणे पोलिसांनी वसई येथून धरपकड केली आहे. त्यांनी बोईसर येथून हे इंजेक्शन घेतल्याची कबुली दिल्याचे सूत्रांमार्फत सांगितले जात आहे.

म्युकरमायकोसिसची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्ण तपासणी व निदान तसेच तातडीचे उपचार करण्याच्या सूचना उपचार केंद्रांना दिल्या आहेत. – डॉ. राजेंद्र केळकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक