पालघर/कासा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाअंतर्गत तलासरी तालुक्यातील झाई येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीची विद्यार्थिनी सारिका भरत निमला हिचा शनिवारी मृत्यू झाला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीत १३ विद्यार्थ्यांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले असून शाळेनेही आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे. झाई आश्रमशाळेत २४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २०६ निवासी असून त्यामध्ये ९५ मुलींचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या सारिकासह काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, पोटदुखी व तापासाठी शुक्रवारी देहेरी येथील रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले होते. शनिवारी सकाळी न्याहारी करताना सारिका बेशुद्ध पडली. घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वी तिचे निधन झाले. मृत्यू व त्यामागील कारण निश्चित करण्यासाठी तिला डहाणू कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिचा मृतदेह डहाणूतील आगर उपजिल्हा रुग्णालयातून पुढे मुंबईच्या जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. रविवारी त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये फुफ्फुसाला संसर्ग (प्लमनरी कॅसॉलिडॅशन) झाल्याचे म्हटले असून रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. सारिकावर रविवारी तलासरीतील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढण यांनी रविवारी भेट दिली. तिच्या पालकांची भेट घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल, मुख्याध्यापक व इतर कर्मचारी त्यांच्या गावी गेले होते. दरम्यान या आश्रमशाळेतील अन्य विद्यार्थ्यांच्या तपासणीतील १३ विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्याने त्यांना डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे. दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीकडे खासगी बालरोगतज्ज्ञांकडून देखरेख ठेवली जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने व पालक आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यास आग्रही राहिल्याने शाळेला आठवडाभराची सुट्टी देण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अनिश्चित सारिका निमला या विद्यार्थिनीने याच वर्षी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यामुळे तिला पूर्वी काही आजार होता किंवा नाही याबाबत शाळेकडे माहिती उपलब्ध नव्हती. सारिका शनिवारी सकाळी शाळेतच बेशुद्ध पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात येत असतानाच तिचा मृत्यू झाला. फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे म्हटले जात होते. परंतु फुफ्फुसात संसर्गामुळे अचानक मृत्यू होऊ शकत नाही असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. शवविच्छेदनासाठीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत शाळेतील शिक्षकांची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या शाळेतील काही शिक्षकांना बुधवार ६ जुलैपासून ताप व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. हे पाहता गुरुवारपासून आजारी विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी पुरेशा प्रमाणात लक्ष दिले नाही, असे काही पालकांचे म्हणणे आहे.