टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचे जिल्ह्यात अनेक प्रकार घडले आहेत. अलीकडेच बोगस टीईटी उत्तीर्ण झाल्याची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. वाडा मध्ये याच प्रकरणात एका त्रस्त व्यक्तीने शिक्षणाधिकारी यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. यामुळे शिक्षण विभागातील कथित गैर व्यवहाराशी अपहरण प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एका घरामध्ये लपवून ठेवलेले या मुलीची सुटका पोलिसांनी १२ तासात केली असून एका आरोपीला अटक केली आहे.वाडा शहरात अशोक वन परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थीनीला काल (१२ ऑगस्ट रोजी) सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास एका वाहनात बसून वाडा तालुक्यातील काही अंतरावर असणाऱ्या ऐनशेत गावाजवळ एका शेतघराचा ठेवण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अपहरणात एका सफेद गाडीचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले होते. वाडा पोलिसांनी तपास करून सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास या मुलीची अपहरणकर्त्याकडून सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून ही व्यक्ती वाड्यात शिकवणी (क्लास) घेत असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात पालघर जिल्हा पोलीस तपास करीत असून अपहरण केलेल्या मुलीचे वडील हे शिक्षणाधिकारी यांच्याकरिता वाडा परिसरात काम करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सीईटी प्रकरणात वाड्यातील काही शिक्षकांनी त्यांच्यामार्फत व्यवहार केल्याची सांगितले जात असून या पैकी काही टीईटी उमेदवार बोगस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट झाल्याने संतप्त झालेल्या काही शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या कथित मध्यस्थ्याला धडा शिकवा म्हणून अपहरणाचे बनाव केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात टीईटी परीक्षे मधील गैर प्रकारच्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.