पालघर: शिक्षकदिनी होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दीड महिना उलटून गेल्यावरही पालघर जिल्हा परिषदेने तो घोषित न केल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय शिक्षकदिनी तो घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी शिक्षकदिनीच शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहेत. मात्र पालघर जिल्हा परिषद यात मागे पडली आहे. इतकेच नव्हे तर पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांची यादीही जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन नवीन पिढी व सुशिक्षित समाज तयार करण्याचे काम शिक्षकवर्ग तळमळीने करीत असले तरी शिक्षण विभागाच्या अशा वागण्यामुळे खंत व्यक्त केली जात आहे. शिक्षकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोपही काही शिक्षकांनी केले आहेत. ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जनाची सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे सुट्टीचे कारण देऊन तो १४ सप्टेंबरला करण्याचे निश्चित केले गेले. मात्र त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून सोहळा अजूनही जाहीर केला नाही. आता तो नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी समोर येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांसह विषय समिती सभापतींचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने हा सोहळा तेव्हा होईल याची शक्यता धूसर आहे. पुरस्कार सोहळय़ाबाबत आजही अनिश्चितता आहे. पालघर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाले आहेत? याची घोषणा न केल्याने याबाबत संभ्रम कायम आहे. शिक्षक पुरस्कार हा शिक्षकदिनीच होणे आवश्यक आहे. राजकीय पुढाऱ्यांस व्यासपीठावर बसण्याची संधी मिळणार नसल्याने पुरस्कार सोहळा पुढे ढकलला जात आहे. अजूनही तो घोषित न करणे ही जिल्हा परिषदेसाठी लज्जास्पद बाब आहे, अशा शब्दात शिक्षक पतपेढीच्या एका सेवानिवृत्त सदस्य शिक्षकाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर हा सोहळा नक्कीच घेतला जाईल असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. विद्यमान सरकार शिक्षकांना पुरस्कार देण्याबाबत करत असलेल्या टाळाटाळीला पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून मी निषेध व्यक्त करत आहे. शिक्षकांची ही थट्टा सुरू असून हा प्रकार अपमानास्पद आहे. ११ नोव्हेंबर या शिक्षणदिनी तरी या पुरस्काराचे वितरण व्हावे अशी अपेक्षा आहे. -संतोष पावडे, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी, पालघर ठाणे जिल्हा