पालघर : प्रशासनाची नजर चुकवून जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी बेसुमार वाळू उत्खनन सुरूच आहे. अपुरे मनुष्यबळ व साधनांच्या अभावामुळे वाळू माफियांना थोपवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे, असे सांगितले जाते, तरी पोलीस प्रशासनाच्या आर्थिक हितसंबंधांमुळे हे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. डहाणूत दररोज रात्री व पहाटेच्या दरम्यान वाळू उत्खननाचा सपाटा सुरूच आहे. याचा मोठा दुष्परिणाम पर्यावरणासह समुद्र किनारपट्टीवरील वस्त्या व गावांना होत आहे. दररोज शेकडो ब्रास वाळू वाहतूक होत आहे. वेगवेगळय़ा शकला लढवून व प्रशासनाची नजर चुकवून हे प्रकार होत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. उत्खननामुळे गेल्या आठ दहा वर्षांमध्ये समुद्रकिनारे खचले आहेत. भरतीचे पाणी किनाऱ्यालगतच्या सुरुच्या बागा, वस्त्यांमध्येही शिरत आहेत. त्यामुळे नागरिकाचे नुकसान होत आहे. सुरुची अनेक झाडे उन्मळून पडू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी डहाणू तहसीलदार यांनी रात्रीच्या वेळेस एका गावात धाड टाकली. मात्र तपास यंत्रणा अपुरी पडल्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करता आली नाही. दोन वाहने पकडली असली तरी ती कोणाच्या आहेत याचा तपास अद्याप लागलेला नाही. महसूल व पोलीस विभागाच्या वादात वाळू माफिया मोकाट आहेत. डहाणूच्या प्रांताधिकारी यांनाही ठोस उपाय योजना करता आलेली नाही. अॅप, कक्ष बिनकामी वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅन्ड मायिनग अॅप विकसित करून त्याचे अनावरण केले होते. या अॅपबाबत मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी झाली नाही. याच बरोबरीने या अॅपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. याआधीही बेकायदा वाळू उत्खनन यासाठी कक्ष स्थापन केला होता. मात्र त्याचाही फारसा उपयोग झालेला नाही. माफियांची दहशत वाळू उत्खनन व वाहतूक करणारे माफिया हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांची दहशत आहे. उत्खनन सुरू असल्याचे उघडय़ा डोळय़ाने दिसत असतानाही नागरिक भीतीने त्यांची तक्रार करत नाहीत. अशा गुंड प्रवृत्तीच्या वाळू माफियांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी समोर येत आहे. पर्यटकांची नाराजी चिखले, नरपड, आगर या समुद्रकिनारी वाळू उत्खनन केल्यानंतर मोठमोठे खड्डे तयार होतात. त्यामुळे किनारा भकास दिसतो. पर्यटनासाठी सुपरिचित असलेल्या किनाऱ्यावर पर्यटकांना या खड्डय़ांचा मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे पर्यटक समुद्रकिनारे ऐवजी इतर पर्यटनस्थळांना पसंती देतात. त्यामुळे एक प्रकारे नुकसानच होत आहे. वाळू उपशाबाबतची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन नावे उघड करते. माहिती देणाऱ्यांवर माफिया डाव ठेवून असल्याने जिवाला धोका आहे. दररोज शेकडो गाडय़ा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. प्रशासन वाळूमाफियांशी हातमिळवणी करत असल्याने दररोज हा प्रकार सुरूच आहे. -स्थानिक रहिवासी, नरपडै असा प्रकार सुरू असल्याचा तपशील मिळाल्याशिवाय पुढील प्रक्रिया राबवू शकत नाही. शासनाच्या अनेक कामांचा ताण कार्यालयावर आहे. त्यातच मनुष्यबळ व तत्सम यंत्रणेचा अभाव आहे. तरीही यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न केले जातील. -आशिमा मित्तल, सहायक जिल्हाधिकारी, उपविभाग डहाणू