कासा, तवा, महालक्ष्मी, मुरबाड, सारणी, दह्याळे गावांचा विकास विभाजनाअभावी खुंटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे डहाणू : डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागातील कासा, तवा, महालक्ष्मी, मुरबाड, सारणी या पाच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध सोयीसुविधांवर वाढती लोकसंख्येचा ताण पडून विकासकामांवर मर्यादा येत असल्याने मोठय़ा ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याची ग्रामस्थांकडून कित्येक वर्षांपासून मागणी होत आहे. गेल्या ४० वर्षांपासून सदर ग्रामपंचायती विभाजित झाल्या नसल्याने लोकसंख्येअभावी विकासकामांवर परिणाम होत आहे. तर गावे विकासकामांपासून दुर्लक्षित असून ग्रामपंचायत विभाजनाअभावी सदर गावांचा विकास खुंटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कासा ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पाहिली जाते. या गावात मागील पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. कासा ग्रामपंचायतीमध्ये कासा, भिसेनगर, भराड, घोळ या चार महसुली गावांचा समावेश होतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानातून गावाच्या विकासावर मर्यादा येतात. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या १० हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या विभाजनाची मागणी होत आहे. मुंबई-अहमदाबाद माहामर्गालगत असलेल्या तवा ग्रामपंचायतीत तवा, कोल्हाण, धामटणे, पेठ ही चार महसुली गावे सामाविष्ट आहेत. आज या गावांचा विस्तार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. मात्र ४० वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या सदर ग्रामपंचायतीचे वारंवार नागरिकांकडून मागणी करूनही विभाजन केले जात नाही. परिणामी गाव-पाडय़ांच्या विकासाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तवा ग्रामपंचायतीच्या विभाजनाची गरज असल्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. महालक्ष्मी ग्रामपंचायतीमध्ये विवळवेढे, सोनाळे, खानिव, आंवढाणी ही चार महसूली गावे समाविष्ट आहेत. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, निकावली, आंबिवली या गावांचा समावेश होतो. विभाजनाभावी या ग्रामपंचायतींतील गावे व पाडय़ांमध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, इत्यादी सुविधा पोचवण्यात मर्यादा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या प्रमुख ग्रामपंचायतींच्या विभाजनाची मागणी होत आहे. कासा, तवा, महालक्ष्मी, मुरबाड, सारणी, दह्याळे ग्रामपंचायत निर्मितीच्या वेळी असलेल्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आता ४० वर्षांनंतर लोकसंख्येत पाच ते सहा पटीने वाढ झालेली असून गावांमध्ये नवीन पाडय़ांची निर्मिती झाली आहे. परंतु या पाडय़ांना रस्ते, पाणी आदी सुविधापासून वंचित राहावे लागते. डहाणु तालुक्यातील दह्याळे ग्रामपंचायत तसेच कैनाड ग्रामपंचायतींमध्येही हीच परिस्थीती आहे. त्यामुळे वाढलेली लोकसंख्या आणि ग्रामपंचायतींचा विस्तार लक्षार घेता मोठय़ा ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा मुख्य प्रश्न निर्माण झालेला आहे. उर्से ग्रामपंचायतीत चार मोठय़ा गावांचा समावेश डहाणु तालुक्यातील उर्से या ग्रामपंचायतीमध्ये उर्से, म्हसाड, साये, अंबिस्ते या चार मोठय़ा गावांचा समावेश आहे. ग्राम-पाडय़ाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान अपुरे पडत असल्याने रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांवर ताण पडत आहे. त्यामुळे त्या गावांमधील विकासकामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे उर्से ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच मुंबई-अहमबादाबाद महामार्गापलीकडच्या मुरबाड ग्रामपंचायतीमध्ये मुरबाड, वांगर्जे व पिंपळशेत ही तीन गावे येतात. अशा प्रकारे आदिवासी भागातील २० ते २५ ग्रामपंचायती तीन ते चार गावांसाठी एकच ग्रुपग्रामपंचायत असून सदर ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाच ते सहा हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे विभाजन झाल्यास गाव-पाडय़ांचा विकास होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.