विनायक पवार

बोईसर व लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणु संशोधन केंद्र, तारापूर औद्योगिक वसाहत यासारखे महत्त्वाचे प्रकल्प परिसरात झाल्याने लोकसंख्या वाढून बोईसर गावाचे वेगाने नगरीत रूपांतर झाले आहे. मात्र वाढत्या नागरीकरणाचे अतिरिक्त ओझे बोईसर ग्रामपंचायतीला पेलवेना झाले असून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक मर्यादा येत आहेत. या नगरीतील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक अनेक समस्यांचा सामना करीत आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

बोईसरमध्ये राहणाऱ्या जवळपास दीड लाख लोकसंख्येला तारापूर औद्योगिक वसाहतीकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र शहरातील सतत वाढती लोकसंख्या आणि झोपडपट्टी भागात हजारो बेकायदेशीर नळजोडण्या देण्यात आल्याने पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होतो. त्यातच एमआयडीसीचा ग्रामपंचायतीवर पाच कोटींपेक्षा अधिक पाणी कर थकीत असून प्रस्तावित गारगाव-खानिवडे पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू करणे आवश्यक झाले आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि उघडी गटारे

बोईसर-पालघर आणि बोईसर-तारापूर या प्रमुख रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काँक्रीटीकरण करण्यात आले असले, तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे. शिगाव फाटक रोड, वंजारवाडा, दांडीपाडा रस्ता, सिडको रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना उखडलेले रस्ते आणि खड्डय़ातून मार्गक्रमण करावे लागते. त्याचप्रमाणे रस्त्याशेजारी गटारेही उघडी असल्याने नियमित सफाई अभावी तुंबून त्यातील घाण सांडपाणी रस्त्यावर येते. मान्सूनपूर्व नालेसफाई ही व्यवस्थित केली जात नसल्याने पावसाळय़ात पाणी तुंबून नागरिकांना पुराचा फटका बसतो.

स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आणि वाहनतळाचा प्रश्न

बोईसर रेल्वे स्टेशन, नवापूर नाका आणि ओस्तवाल परिसरातील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी जटिल होत आहे. अरुंद रस्ता, फेरीवाले, रस्त्यावरच उभी केलेली प्रवासी आणि खाजगी वाहने, बेशिस्त वाहनचालक यामुळे सकाळ- संध्याकाळ गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच रिक्षा, डमडम, इको या प्रवासी वाहनांना उभे राहण्यासाठी वाहनतळ नसल्याने ही वाहने स्टेशन परिसर, नवापूर नाका आणि तारापूर रोडवरील स्टँडवर आडवी-तिडवी उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत असते. वाहतूक नियंत्रणासाठी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे, रस्त्याकडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांना इतरत्र स्थलांतरित करणे, बेकायदा पार्किंग रोखने, गर्दीच्या वेळेत एकदिशा मार्ग करणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर बोईसर स्टेशन परिसराचा संपूर्ण पुनर्विकास करणे अत्यावश्यक झाले असून स्टेशन भागातील बाजारपेठ अधिक सुटसुटीत करण्यासाठी योजना आखणे आवश्यक झाले आहे.

वेगाने फोफावणारी अनधिकृत बांधकामे

तारापूर औद्योगिक वसाहत सुरू झाल्यानंतर बोईसर शहराची लोकसंख्या वेगाने वाढू लागली. कारखान्यांत काम करणाऱ्या  बहुतांशी हजारो परप्रांतीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना राहण्यासाठी शहरातील भूमाफियांनी सरकारी, आदिवासी आणि वन जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत झोपडपट्टय़ा तयार करण्याचा सपाटा लावला. यामुळे भैय्या पाडा, दांडी पाडा, धनानी नगर, गणेश नगर, राणी शिगाव रोड, शिगाव रोड आणि लोखंडी पाडासारख्या भागात हजारो अनधिकृत चाळी तयार झाल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीकडूनही त्वरेने ना हरकत दाखला आणि घरपट्टी देण्यात येत असल्याने तसेच महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने शहराला बकाल रूप आले आहे. अशा अनधिकृत भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असल्याने उपलब्ध साधन सामग्रीवर त्राण येत आहे.

नगर परिषद स्थापनेसाठी फक्त आश्वासने

बोईसर आणि लगतची सरावली, पास्थळ, खैरापाडा, बेटेगाव, मान, कोलवडे, कुंभवली, सालवड आणि पास्थळ या सर्व ग्रामपंचायतींची एकत्रित लोकसंख्या तीन लाखांवर पोचली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला या प्रचंड लोकसंख्येला आवश्यक मूलभूत नागरी सुविधा पुरविताना नाकी नऊ येत आहेत. या सर्व भागाचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी गेली अनेक वर्षे बोईसर आणि परिसरातील आठ ग्रामपंचायतींची बोईसर नगर परिषद स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार आश्वासने देऊनही या मागणीला आजवर यश आलेले नाही. बोईसर आणि परिसरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी आणि या भागाचा आगामी काळात सुनियोजित विकास साधण्यासाठी नगर परिषद स्थापन करणे आणि आगामी काळात पालघर बोईसर महापालिका स्थापन करणे गरजेचे झाले आहे.

घनकचरा व्यवस्थापन बोईसर शहरातील नागरिकांना भेडसावणारी घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. बोईसर क्षेत्रात दररोज १८ ते २० टन जमा होणारा कचरा उचलून विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक सफाई कर्मचारी नसल्याने अनेक ठिकाणचा कचरा तीन-चार दिवस उचलला जात नाही. साचून राहिलेला कचरा कुजून प्रचंड दुर्गंधी निर्माण होते, त्याचप्रमाणे रोगराई वाढीस कारणीभूत ठरून नागरिकांना त्रास होतो. कचरा व्यवस्थापन केंद्र या भागात नसून जमा झालेला कचरा टाकण्यासाठी अधिकृत कचराभूमी उपलब्ध नसल्याने खाडीकिनारी मोकळय़ा जागेत सध्या हा सर्व कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. बोईसर आणि शेजारील सर्व आठ ग्रामपंचायती मिळून संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी जागा उपलब्धतेची समस्या कायम राहिली आहे.