पालघर: गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालघरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी पुष्टी कृषी विभागाने दिली आहे. त्याउलट हा पाऊस भातशेतीसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जात आहे.

पालघर जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र भातशेतीच्या लागवडीखाली येते. हवामान बदलामुळे पावसाचा हंगाम अचानक बदलल्याने अलीकडेच भातशेतीचे नुकसान झाले होते. आत्ताही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र हा पाऊस भातशेतीसाठी चांगला आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. भातपिकाचा हंगाम निम्म्याहून अधिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सद्य:स्थितीमध्ये भातपीक बहरत असून भातपिकांमधील फळांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हा पाऊस अपायकारक नसून लाभदायक आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

भात पिकांमध्ये पाणी साचून राहण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने हे पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत तसेच भातशेती संदर्भात कोणतीही समस्या उद्भवल्यास कृषी साहाय्यक किंवा कृषीतज्ज्ञ यांच्याशी तातडीने संपर्क साधून समस्यांचे निरसन करावे, असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

पालघर जिल्ह्यात ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर  खरीप हंगामात लागवड केली जाते. यामध्ये भातपिकाचे प्रमाण मोठे आहे. तर नागली, तूर, उडीद आदी इतर पिकेही डोंगराळ भागात घेतली जात आहेत. जिल्ह्यात भात हे प्रमुख अन्न असल्यामुळे विविध ठिकाणी भात लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. किनारपट्टी भागासह पठारी व डोंगराळ भागात वेगवेगळय़ा मातीच्या प्रकारानुसार हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन पद्धतीची भात शेती केली जाते. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र वाडा, पालघर व डहाणू तालुक्यातील आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात जोरदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची भात पेरणीच्या रोपवाटिकेसाठी लगबग सुरू झाली होती. त्यानंतर पाऊस पडला नसल्यामुळे काही काळ शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतली. मग आलेल्या समाधानकारक पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवड पूर्ण केली. त्यानंतर भातपिकाना आवश्यक असलेला पाऊस पडला. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पावसाने काहीशी उसंत दिली. शेती क्षेत्रात असलेल्या ओलाव्यावर भातपिकांची वाढ झाली. आता भातपिकांमध्ये दाणा भरण्याच्या प्रक्रियेची वेळ आहे. अशातच गेल्या तीन चार दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसाने शेतकरी वर्गाची चिंता वाढवली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पिकांची नासधूस होते की काय अशी भीती वाटू लागली. मात्र हा पाऊस भातशेतीला नुकसान करणारा पाऊस नसून तो उपयुक्त असल्याचे तसेच जिल्ह्यातील भातपीक उभे असल्याचे कृषी विभागाने म्हटल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

खरीप लागवड क्षेत्र

तालुका        क्षेत्र

वसई         ७३९१.४

वाडा          १४०१९.३

डहाणू         १३९३२.०२

पालघर        १५२१९.५

विक्रमगड       ७१३१.५

जव्हार        ६५०५.६

मोखाडा       २०६५.७२

तलासरी       ९४१३.३२

एकूण         ७५६७८