सागरी पोलीस चौक्या दुर्लक्षित डहाणू : डहाणू किनारपट्टी संवेदनशील असताना सागरी पोलीस चौक्या मात्र दुर्लक्षीत आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेशी जोडलेले तपासणी नाके सीसीटीव्हीने जोडणे आवश्यक आहे. तसेच सागरी प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणाची आवश्यकता आहे, अशी मागणी होत आहे. चिखले येथील तटरक्षक दलाचा प्रकल्प आहे. दोन वर्षांंपूर्वी हॉवरक्राफ्ट दाखल झाली होती. त्या धर्तीवर नियमित गस्तीची येथे गरज आहे. शिवाय डहाणू सागरी पोलिसांच्या तीनही गस्तीनौका २४ तास सज्ज राहिणे गरजेचे आहे. २६/११ ची घटना पाहता सीमा भागातील सागरी सुरक्षा सक्षम करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा कसाब व अन्य दहशतवादी गुजरातच्या सागरीक्षेत्रातून पालघरमार्गे घुसले होते. शिवाय गुजरात समुद्रात तटरक्षकदलाने जेथे संशयित बोटीचा स्फोट केला ते ठिकाण मुंबई सागरी सीमेतच आहे. त्यामुळे या भागाच्या सुरक्षेचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. डहाणू नगर परिषद क्षेत्रात ६० हजार लोकसंख्या आहे. डहाणू पोलीस ठाण्यात १५० पोलिसांची आवश्यकता आहे. मात्र ही संख्या निम्म्यावर आहे. ग्रामीण पोलिसांना मनुष्यबळाची कुमक आजतागयत वाढवून मिळालेली नाही. मोजके दिवस वगळता वर्षभर सागरी चौक्या बंदच असतात. त्यांना सीसीटीव्हीने जोडणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात रस्त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापी येथील प्रमुख सागरी राज्य मार्गाचे चौपदरीकरण अजूनही झालेले नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. दैनंदिन कामकाजांसाठी लागणारे मनुष्यबळ पाहता काही पोलीस चौक्यांवर नेमणुका करू शकत नाहीत. इतर ठिकाणी मनुष्यबळ पुरवता येत नाही. ही एक मोठी समस्या आहे. -धनाजी नलावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणू