पावसाळय़ात गळती आणि अंतर्गत सजावटीवर परिणाम होण्याची शक्यता पालघर: सिडकोतर्फे पालघर जिल्हा मुख्यालय इमारतींच्या दर्जाहीन कामांबाबत वेळोवेळी करण्यात आलेल्या तक्रारीबाबतचे तथ्य आता पुढे येऊ लागले आहे. जिल्हाधिकारी इमारतीच्या बाह्यभागाला तडे (सुपरफिशियल क्रॅक्स) जाऊ लागले आहेत. या तडा वाढून इमारतीचा बाह्यभाग कमकुवत होऊन यामुळे इमारतीची मजबुती तसेच अंतर्गत लाकडी सजावटीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालय इमारत बांधकाम सुरू झाल्यापासून इमारतींच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात होती. इमारत पूर्ण होऊन त्यामध्ये कार्यालये सुरू होऊन सहा महिने लोटत नाही तोच बाह्यभागावर व सजावट केलेल्या भागात, इमारतींचे सजे, बीम आदी ठिकाणी प्लास्टरवर तडे गेल्याचे दिसून येत आहे. सिडकोच्या ठेकेदाराने बांधकामात वापरलेला कच्चा माल योग्य दर्जाचा नसल्याने किंवा प्लास्टरनंतर योग्य प्रमाणात पाणी न वापरल्याचे (क्यूरिंग) हे परिणाम असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निर्माण झालेल्या भेगांमधून पावसाचे पाणी झिरपल्यास बाह्यभाग व काही प्रमाणात अंतर्भागावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. सद्य:स्थीतीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेच्या इमारतीत कार्यालये सुरू आहेत. या इमारतींचा दोषदायित्व कालावधी भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर दोन वर्षांपर्यंत सीमित आहे. त्यामुळे बाह्यभागात भिंतींना जात असलेले तडे बुजविण्याकडे किंवा त्यावर वॉटरप्रूफिंगसारख्या उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे अधोरेखित होत आहे. कार्यरत असणाऱ्या सर्व इमारतींच्या विविध भागांमध्ये तडा जाऊ लागल्याने बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिलेल्या सिडकोतर्फे करण्यात आलेल्या कामाबद्दल शंका व्यक्त होत आहे. इमारतींच्या कामांकडे किंवा त्याच्या परीक्षणाची जबाबदारी सिडकोची व संबंधित ठेकेदारावर होती. भिंती, सज्जा, सुशोभीकरण व नक्षीकाम केलेल्या जोडभागात गेलेल्या तडा यांचे परीक्षण झालेले नाही. या इमारतींच्या बांधकामात आढळलेल्या त्रुटींबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने सिडकोला कळवणे आवश्यक झाले असून पावसाळय़ापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण गरजेचे झाले आहे. दुरुस्ती करणार सिडकोशी संपर्क साधून याबाबत आवश्यक दुरुस्तीची मागणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले तर जिल्हा मुख्यालयाला गेलेल्या तडा यांची पाहणी करून पुढे आवश्यक ती दुरुस्ती व उपाय योजना केल्या जातील असे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हटले आहे. आयुष्यमान कमी होण्याची शक्यता तडा गेल्याने पावसाळय़ाचे पाणी या तडांमधून भिंतींचे नुकसान करेल. त्याचबरोबर कार्यालयातील आतील भागात ओलावा निर्माण झाल्यास अंतर्गत लाकडी सजावट व भिंती दुरवस्थेत सापडतील अशी शक्यता आहे. तडा गेलेले भाग कमकुवत होऊन त्याचे आयुष्यमान कमी होईल अशी शक्यता वास्तुविशारद व्यक्त करीत आहेत.