जिल्ह्य़ात  ८७७ कामांवर २७ हजार २४४ मजूर 

पालघर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची पालघर जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांपासून कार्यक्षमरीत्या अंमलबजावणी होत असून विद्यमान आर्थिक वर्षांत मजदूर उपस्थितीमध्ये पालघर जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर राहिला आहे. गतवर्षीप्रमाणे आदिवासी मजुरांना रोजगार पुरविण्यात देखील पालघर जिल्हा राज्यात सध्या अव्वल स्थानी आहे.

पालघर जिल्ह्य़ात सध्या ८७७ कामांवर २७ हजार २४४ मजूर कार्यरत असून राज्यात जिल्हा अग्रस्थानी आहे. पालघर पाठोपाठ अमरावती (३०७२ कामे २४ हजार ४३ मजूर), नंदुरबार जिल्हा (१८४७ कामे ९३७० मजूर), औरंगाबाद (१७२० कामे ९२४८ मजूर) व नांदेड (९१६ कामे ८४८२ मजूर) आहेत.

जिल्ह्य़ात सध्या ८८५६ कामे शेल्फवर (मागणी केल्यास देण्याकरिता तांत्रिकरीत्या मंजूर) तयार असून त्यामधून १६ लक्ष ४८ हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ दिन निर्मितीची क्षमता आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून विद्यमान वर्षांमध्ये आदिवासी मजुरांना काम पुरवण्यात जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. विद्यमान वर्षी ५९ लाख ७७० कुटुंबातील १६ लाख ४६ हजार २११ दिवस आदिवासी मजुरांना कामे पुरविण्यात आली आहेत. तसेच मागील वर्षी (सन २०२०-२१ मध्ये) देखील जिल्ह्य़ाने सुमारे ४६ लाख ५१ हजार आदिवासी मजुरांना काम पुरवून जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला होता.

विद्यमान आर्थिक वर्षांत एकंदर काम पुरवण्यात जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून करोना संक्रमणाचा प्रभाव असतानाही जिल्ह्य़ाने  सुमारे ५० लाख  रोजगार निर्मिती केली आहे. विद्यमान वर्षांच्या उद्दिष्टासमोर ७० टक्के उद्दिष्ट जिल्ह्य़ाने गाठले असून २०२०-२१ या आर्थिक वर्षांत जिल्ह्य़ाने उद्दिष्टाच्या १७७ टक्के रोजगार निर्मिती केली होती. गेल्या चार वर्षांत उद्दिष्टापेक्षा सरासरीने अधिक कामे नोंदवली आहेत. यंदाच्या वर्षांत सहा हजार २२७ कामे पूर्ण झाली असून सुमारे साडेसात लाख रुपयांचे मजुरी खर्च अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून प्राप्त झाली आहे.  जिल्ह्य़ातील गरजू मजुरांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर न करता रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.

प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न

प्रशासनाने  मजुरांकडून मागणी याद्या स्वीकारून त्यांचे पाच दिवसात आवश्यक नमुन्यांमध्ये मागणी सादर करण्याच्या सूचना अधिकारीवर्गाला दिल्या आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन संबंधितांचा नियमित आढावा बैठकांचे आयोजन करून योजनेत काम करण्यासाठी मजुरांना प्रोत्साहन देण्यासोबत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

कोकण विभागात सरस

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी व मजूर उपस्थितीमध्ये पालघर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी असताना कोकण विभागातील रत्नागिरी जिल्हा (२७ क्रमांक ३१२२ मजूर), सिंधुदुर्ग जिल्हा (२९ क्रमांक २१६१ मजूर), रायगड जिल्हा (३२ क्रमांक १०३४ मजूर), तर ठाणे जिल्हा (३४ क्रमांक ६१० मजूर) हे क्रमवारीत खाली आहेत.