पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे तसेच काहींचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी २० जुलै रोजी तर तीन विषय समितींच्या सभापती पदासाठी २२ जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करून निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी तसेच बांधकाम व वित्त सभापती काशिनाथ चौधरी यांच्या कार्यकाळाला सव्वा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षणावर निवडून आलेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे, महिला बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे व पशुसंवर्धन सभापती सुशील चुरी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी काढलेल्या पत्रानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने महिला व बालकल्याण सभापती तसेच उर्वरित दोन सभापती पदांच्या निवडीसाठी २२ जुलै रोजी दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही निवडणूक कार्यक्रमांसाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांना पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. या निवडणूक कार्यक्रमादरम्यान करोना संदर्भातील घ्यावयाच्या दक्षतेच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीतर्फे स्वतंत्र गट स्थापन करण्याचा प्रयत्न सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेसचे मिळून नऊ सदस्य संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी व सुनीता धूम यांच्या यांच्या वगळता ज्ञानेश्वर सांबरे, संदेश ढोणे, गणेश कासट, मंदा घरट, शीतल धोडी, शैलेश करमोडा व देवानंद शिंगडे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे. या गटाला मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रथम १२ जुलै रोजी व नंतर १४ जुलै रोजी तीन वेगवेगळ्या वेळा दिल्या असल्या तरीसुद्धा गट स्थापनेसाठी जिल्हाधिकारी उपलब्ध झाले नसल्याची तक्रार नव्याने गट स्थापन करत असल्याच्या मंडळींची आहे. या स्वतंत्र गट स्थापनेमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. समाजकल्याण सभापतींचा राजीनामा नाही समाजकल्याण सभापती बहुजन विकास आघाडीचे विष्णू कडव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होती. हा राजीनामा पत्र विहित नमुन्यात नसल्याने पुन्हा नव्याने सादर करण्याचे सांगण्यात आल्यानंतर नव्याने राजीनामा सादर करण्यात आला नसल्याची जिल्हा परिषद सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे २० जुलैपर्यंत पालघर जिल्हा परिषदेचे ते एकमेव पदाधिकारी कार्यरत आहेत.