कासा : आशागड ग्रामपंचायत हद्दीत आंबेसरी धुंदळवाडी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांसमोर रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. डहाणूच्या आशागड-आंबेसरी-धुंदलवाडी राज्य मार्गाचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे. हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या मार्गावरील आशागड गाव हद्दीत रस्त्यालगत किराणा, भांडी विक्री दुकाने, भाजीपाला आणि फळ विक्रेते, चिकन सेंटर तसेच कडधान्यांचे ठेले लावले जात आहेत. शिवाय रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीचा खोळंबा ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यात अडचणी येत आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला कोणतेही अंतर न सोडता काही कच्ची आणि पक्की दुकाने उभारली जात आहेत. त्यामुळे या मार्गावर बरीच वाहने खोळंबून राहतात. डहाणू चारोटी राज्यमार्गावर दिवसभर दुकाने लावली जात आहेत. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.