नवीन इमारतीच्या उभारणीसाठी पाच कोटींचा निधी
पालघर: जव्हार संस्थानाची ऐतिहासिक खूण असलेली वास्तू पाडण्याच्या कामास सुरुवात केली आहे. १०० वर्षांपेक्षाही जुनी असलेली ही वास्तू धोकादायक स्थितीत असल्याने ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वास्तूमध्ये जव्हार तहसील कार्यालय कार्यरत होते. ही वास्तू पाडून येथे नवीन इमारत बांधण्यात येणार असून त्यानंतर तहसील कार्यालय येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तूमध्ये जव्हार तहसील कार्यालय कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीचा काही भाग कोसळत असल्याचे तसेच भिंती ओल्या होत असल्याचे कारण सांगून या इमारतीची स्थापत्य परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत धोकादायक ठरविल्याने ती जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर किमान ४० ते ५० लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकीकडे राज्याची पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात असताना जव्हारच्या राजांनी उभारलेली वास्तु जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती जमीनदोस्त करण्यास आरंभ केल्याबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या वास्तूच्या भिंती चुना मातीने तयार केल्यामुळे पोकळ झाल्या होत्या. त्यामुळे सज्जाच्या भाराने भिंती कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे ही इमारत तोडण्याच्या निर्णय घेण्यात आला. नवीन कार्यालयाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जव्हार शाखा अभियंता डी.डी.पाटील यांनी सांगितले.
पूर्वीचे शालीमार हॉटेल
जव्हार संस्थानाची शेवटचे नरेश यशवंतराव मुकणे यांनी सुमारे शंभर वर्षापूर्वी या भागात पर्यटनाचा विकास व्हावा यादृष्टीने शालिमार नावाचे हॉटेल उभारून पर्यटकांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा केली होती. इंग्लंडमध्ये शिक्षण झालेल्या जव्हारच्या राजांनी शहराचा नगरविकास व रचना इंग्लंडमधील इमारतींप्रमाणे केली होती. हॉटेल शालीमार वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या वास्तूत सध्या जव्हारचे तहसील कार्यालय सुरू होते.