पालघर जिल्ह्य़ात अनेक पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला कासा : पालघर जिल्ह्यत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीला पूल आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नदी किनारा परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चारोटी-डहाणू रस्त्यावरील गुलजारी नाला नदीला पूर आल्यामुळे चारोटी येथील पूल दोन तास पाण्याखाली गेला होता. त्याचप्रमाणे कासा-सायवन, वाडा-भिवंडी, तलासरी-उमरगाव, मनोर- पालघर या प्रमुख रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, तर जव्हार तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते, पूल पाण्याखाली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेला पाऊस थांबला नाही तर हाताशी आलेले भात, उडीद, नागली यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे पिकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.