कासा: मुंबईला गुजरात तसेच उत्तर भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-४८) सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे. दररोज हजारो अवजड वाहने ज्वलनशील पदार्थ व धोकादायक वायूंची वाहतूक या महामार्गावरून केली जाते. मात्र एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर अद्यापही एकही अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.
मुंबईतील दहिसरपासून पालघर जिल्ह्यातील अछाडपर्यंत सुमारे १२० किलोमीटर अंतराचा महामार्ग असून यामध्ये डहाणूच्या चारोटी, वसईच्या खानिवडे आणि दहिसर येथे टोल नाके कार्यरत आहेत. दररोज कोट्यवधी रुपयांची टोल वसुली या टोलनाक्यांवरून केली जाते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे टोल ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोघांनीही सपशेल दुर्लक्ष केले आहे.
या महामार्गावर १९९१ साली पालघरजवळ मेंढवन घाटात टँकरला लागलेल्या भीषण आगीत तब्बल १०२ जणांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडवली होती. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. २०१३ सुमारास डहाणूजवळील चारोटी येथे केमिकल टँकरच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.
महामार्गावरील असे छोटे-मोठे अपघात आणि आगीच्या घटना सतत घडत असतात. ट्रक, टँकर, मोटरसायकल्स, प्रवासी वाहने आगीच्या घटनेत होरपळून जात आहेत. मात्र महामार्गावर जवळपास एकही अग्निशमन दलाची गाडी नसल्याने आग विझवण्यासाठी डहाणू किंवा बोईसर येथील अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा हे दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग विक्राळ रूप धारण करते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेचे नुकसान होते.
स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांकडून वारंवार लेखी तक्रारी करून देखील, टोल वसुलीत व्यस्त असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि ठेकेदारांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. टोल नाक्यावर फायर सेफ्टी सेवा उपलब्ध ठेवणे ही कायद्याने बंधनकारक असताना देखील या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
महामार्गावरून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक दररोज मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यामुळे जर कोणतीही दुर्घटना घडली तर काही मिनिटांत मोठा स्फोट आणि जीवितहानी होऊ शकते, हे वास्तव डोळ्यासमोर ठेवलं तरीही जबाबदार यंत्रणांचा कात टाळाटाळ सुरूच आहे. दरम्यान, काही सामाजिक संघटनांनी या प्रकारच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजवर ज्वलनशील पदार्थांचे टँकर, प्रवासी वाहने, ट्रक्स, कार्स अशा शेकडो वाहनांना आग लागून शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या विषयाची गंभीर दखल घेतली नाही, हे विशेष आहे.
NHAI च्या पॉलिसीमध्ये अग्निशामक टँकरची सुविधा नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील कळवला आहे. जिल्हास्तरावर त्यांनी उपलब्ध करून द्यावा. – सुमित कुमार, महामार्ग प्राधिकरण अधिकारी