कारखान्यातील घातक घनकचऱ्यामुळे या परिसरात रोगराईची भीती डहाणू : चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगत अनधिकृत तयार केलेल्या कचराभूमीमुळे दुर्गंधी पसरून रहिवासी तसेच वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. कारखान्यातील घातक घनकचऱ्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने कचराभूमीची जागा बदलून याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. चिंचणी ग्रामपंचायतीला कचराभूमी नसल्याने या सागरी महामार्गाच्या दुतर्फा कचरा टाकला जात असल्याने येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. खाजण तसेच शेतजमिनीतून गेलेल्या या सागरी महामार्गाच्या दोन्ही बाजूस विस्तृत मोठी खाडी असल्याने गावातील लोकांकडून येथे केर कचऱ्याबरोबरच मृत जनावरे फेकली जातत. तर रात्रीच्या सुमारास बोईसर एमआयडीसी येथील रसायनेयुक्त कचरा या महामार्गाच्या दोन्ही बाजू टाकला जातो. त्यामुळे दिवसभर येथे कुत्रे, जनावरे दिवसभर या घाणीत लोळत असतात. विशेष म्हणजे येथील घाणीचा प्रचंड वास येत असल्याने येथील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा जीव गुदमरत असतो. सागरी महामार्गाच्या तारापूर येथील पुलाजवळ काही लोकांनी खाजण जमिनीवर अतिक्रमण केल्याचे दिसून येते. शासकीय तसेच पडीक जागेवर टाकाऊ कचरा टाकून भराव केला जात आहे. त्यामुळे चिंचणी-तारापूर सागरी महामार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.