पालघर: जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या महिन्यातील पर्जन्यमान सरासरीच्या ३०० टक्के इतके आहे. या अवकाळी पावसात सुमारे ८०० हेक्टरवरील फळबागांचे व भात पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जव्हार व मोखाडा या दोन तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये ६ व ७ मे रोजी जोरदार पाऊस झाला. ६ मेच्या सायंकाळी ताशी २० ते ६० किलोमीटर वेगाने वारा वाहत असल्याने धाकटी डहाणू बंदरात नांगरलेल्या ४५- ५० मासेमारी बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गेल्या दोन दिवसात तलासरी तालुक्यात सर्वाधिक ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून डहाणू तालुक्यात ४२ मिलिमीटर, पालघर व वाडा तालुक्यात प्रत्येकी ३१.३० मिलिमीटर, विक्रमगड तालुक्यात २९.३ मिलिमीटर, वसई तालुक्यात २६ मिलिमीटर तर जव्हार व मोखाडा तालुक्यात प्रत्येकी ८.३० पावसाची नोंद झाली. पालघर शहरात आज सकाळी तब्बल ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून किनाऱ्यालगतच्या भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस काल सायंकाळपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने खंडित झालेल्या वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कालची मध्यरात्र झाली.

जिल्ह्यात आंबा चिकू, जांभु व जांभ या फळांसोबत भाजीपाला व उन्हाळी भात लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे ८०० हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये डहाणू तालुक्यातील ४०० हेक्टर, पालघर तालुक्यातील २०० हेक्टर व वाडा तालुक्यातील १५० हेक्टरचा समावेश आहे. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

तौक्ते नंतरचे सर्वाधिक नुकसान

१६ ते १८ मे २०२१ रोजी पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्याच्या बाजूने तौक्ते चक्रीवादळ गेले होते. त्यावेळी वादळी परिस्थिती सह पालघर शहरात ५०० मिलिमीटर नोंद झाली होती. मे २०२३ च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सरी पालघर मध्ये झाल्या होत्या. तर २०२२ व २०२४ वर्षातील मे महिना कोरडा गेल्याची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली आहे.

नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू करण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे, सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्याचे आणि जेथे आवश्यक असेल तेथे त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे ७६७ हून अधिक घरांचे नुकसान झाले असून, विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सुमारे ५० मासेमारी नौका देखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत. मंगळवारी रात्री मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

मंगळवारी रात्री आलेल्या वादळ आणि पावसामुळे पालघरच्या अनेक तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. एकूण ७६७ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये डहाणू तालुक्यात सर्वाधिक २३० घरांचे नुकसान झाले, त्यानंतर विक्रमगड व वाडा येथे प्रत्येकी ९२, जव्हारमध्ये ८९, मोखाडा येथे ८७, पालघरमध्ये ८५, तलासरीत ६३ आणि वसईमध्ये २९ घरांचे नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यातील ढाकाटी गावात सुमारे ५० मासेमारी नौका आणि १० ते १२ घरे यावेळी नुकसानग्रस्त झाली आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गणेश नाईक यांनी घेतला आढावा

६५ वर्षीय मोरेश्वर लोहार वादळी वाऱ्यांमुळे जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेला चुकून पाय लागल्यामुळे मृत्युमुखी पडले. ही घटना वेदी गावात घडली, जेव्हा ते बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम प्रभावित भागात पाठविण्यात आली आहे.

प्रशासन नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आहे. शासकीय निकषांनुसार पात्र नागरिकांना योग्य ती भरपाई दिली जाईल. नुकसान मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. – गणेश नाईक, पालकमंत्री