शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित डहाणू : सूर्या कालवे पाटबंधारेअंतर्गत गेली सुमारे ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही धरणाचे काम पूर्णत्वास जात असतानाच उजव्या व डाव्या कालव्यांची कामे मात्र अपूर्णावस्थेत आहेत. चारोटी, घोळ दाभोन, ऐना तसेच अनेक भागांत गावाजवळ पाट येऊनही पाटाला पाणी येत नसल्याने बहुतांश शेतकरी उन्हाळी भातशेतीला मुकले आहेत. त्यामुळे कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. डहाणूत सूर्या कालव्यांची दुरवस्था झाल्याने पाटाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. भराड नवापाडा येथे सूर्या कालव्याचा जलसेतू मोडून पडला असल्याने पलीकडे पाणी वाहून नेले जात नाही. परिणामी, सिंचन प्रकल्पच फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेण्याच्या संधीला मुकावे लागत आहे. सूर्या कालवे बांधून ३० ते ३५ वर्षे जुने झाले आहेत. या भागात तीन हजार मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि पाटामध्ये वारंवार गाळ-कचरा साचण्याच्या प्रकारामुळे पाट फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. या कालव्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. ते बुजवण्याचे काम पाटबंधारे खात्याचे आहे. पूर्वी या कालव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एजन्सी नेमण्यात येत होत्या. मात्र त्यांच्या सदोष गुणवत्तेमूळे हे ठेके बंद करण्यात आले. सूर्या प्रकल्पाने दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सहकारी तत्त्वावर एमएमआयसीईबीएफ ही नवी योजना कार्यान्वित केली आहे. पावसाळय़ानंतर डहाणूच्या डोंगरपट्टीतील शेतकरी उन्हाळी भातशेती करून दुबार पिके घेऊन उदरनिर्वाह करतात.