पालघर: तलासरी मंडळ अधिकारी संजय भंडारी यांना सुमारे पंधरा हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. सातबाऱ्यामध्ये महसूल नोंदी करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. तक्रारदाराने त्यांच्याविरुद्ध तक्रार करून भंडारी यांना पकडून दिले. तलासरी तालुक्यातील एका व्यक्तीच्या जमीन सातबाऱ्यात वारस नोंद करण्यास तसेच सातबाऱ्यातील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी भंडारी यांनी तक्रारदाराकडून पंधरा हजारांची लाच मागितली होती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे याविषयी तक्रार केली होती. तक्रारीत तथ्य असल्याची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. दरम्यान भंडारी यांनी पंधरा हजारांपैकी दहा हजारांची लाच शुक्रवारी दुपारी स्वीकारली. नेमक्या त्याच वेळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार नवनाथ भगत, संजय सुतार, विलास भोये, सखाराम दोडे या पथकाने भंडारी यांना पकडून ताब्यात घेतले. तलासरी पोलीस ठाण्यात भंडारींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.