वाडा: पालघर जिल्ह्यात येत्या गुरुवारपासून ३३ खरेदी केंद्रांवर भात, नाचणी खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे. या वर्षी लवकर भात खरेदी सुरू होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, पालघर, वसई, वाडा, विक्रमगड या आठ तालुक्यांतील एकूण ३३ केंद्रांवर ही खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी दिली. पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या वाडा तालुक्यात सर्वाधिक ९ खरेदी केंद्रे असणार आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, कासा व मनोर या चार उपप्रादेशिक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या एकूण ६७८ गावांतील ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या खरेदी योजनेचा फायदा होणार आहे. दरम्यान, भात खरेदीसाठी आवश्यक तेवढी बारदाने उपलब्ध असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती जव्हार आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी दिली. भात कापणी सुरू ग्रामीण भागात हळव्या वाणातील भात पिकांबरोबरच निमगरवी वाणातीतील सर्व भातपिके कापण्यास सुरुवात झाली आहे. कापणीसाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर या भागातून काही मजूर आणले आहेत. तर बहुतांशी शेतकरी भातकापणी करणाऱ्या मशिनच्या साह्याने भात कापणी करत आहेत. ३५० ते ४०० रुपये प्रति तास मशीनचे भाडे असून दिवसभरात १५ ते २० मजुरांइतके या मशीनद्वारे काम होत आहे. सानुग्रहाची प्रतीक्षा गतवर्षी पालघर जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लाखो मेट्रिक टन भाताची विक्री केली. आधारभूत किंमतव्यतिरिक्त येथील शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति क्विंटल ७०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र आजतागायत ते मिळाले नाही. सानुग्रह अनुदानाची एकूण रक्कम २७ कोटी रुपये आहे.