वाडा: मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे गुरुवारी भूमिपूजन व लोकार्पण समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून २६ एसटी बस आरक्षित केल्याने अनेक फेऱ्या रद्द झाल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील प्रवाशांना बसला. वाडा, डहाणू व जव्हार या आदिवासी व ग्रामीण भागातील तीन ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस आगार आहेत. आगारातील बहुसंख्य एसटी बसची वेळापत्रके ही ग्रामीण भागातील खेडय़ापाडय़ांसाठी तयार करण्यात आली आहेत. आगारातील बस मुंबईतील सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आरक्षित केल्याने येथील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे नियमित प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, परीक्षार्थी यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द न करता कल्याण, ठाणे शहरी भागातील फेऱ्या रद्द करून मुंबईत जादा बसफेऱ्या पाठविण्यात आल्या आहेत. -समीर चेंबुरकर, आगार व्यवस्थापक, वाडा बस आगार. कुठल्या आगारातून किती बस आरक्षित वाडा: १० बस आरक्षित, २०हून अधिक फेऱ्या रद्द डहाणू : सहा बस आरक्षित, १५हून अधिक फेऱ्या रद्द जव्हार : १० बस आरक्षित, २५हून अधिक फेऱ्या रद्द प्रवाशांना आर्थिक भुर्दंड कधी पंढरपूर यात्रेसाठी तर कधी त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी ग्रामीण भागातील एसटी आगारातील एसटी बस नेहमीच आरक्षित केल्या जात असल्याने येथील प्रवासी व विद्यार्थ्यांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांचा असरा घ्यावा लागतो.