वीसहून अधिक संशयितांना पोलीस कोठडी पालघर : पालघर जिल्हा पोलिसांच्या विविध पथकांनी महामार्गाच्या विविध विभागांत छापे घालून इंधन व इतर रासायनिक पदार्थ विक्रीसह चोरी करणाऱ्या अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी या सर्व संशयितांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या काही वर्षांमध्ये अवैध धंद्यांचे पेव फुटले होते. यामध्ये भंगारमाफियांसह पेट्रोल, डिझेल व इतर भेसळयुक्त रासायनिक पदार्थ खरेदी-विक्री करणारे माफिया सक्रिय झाले होते. बऱ्याच वेळा पोलिसांनी हे बेकायदा धंदे थांबवण्याचे प्रयत्न केले असले तरी छुप्या पद्धतीने ते सुरू होते. अशा काही टोळय़ा सक्रिय असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा पोलिसांच्या विविध तुकडय़ा या माफियांच्या मागावर होत्या. अखेर पोलिसांनी यातील वीसहून अधिक संशयितांना वेगवेगळय़ा ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. विशेष मोहीम राबवून हे छापासत्र सुरू केल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी कारवाई केल्याचे सांगितले जाते. महामार्गावर उभ्या वाहनांमधून रात्रीच्या वेळी इंधन व इतर द्रवरूप रसायन काढून घेणाऱ्या दोन टोळय़ांवरही कारवाई केली गेली आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. याचे कारण समजू शकलेले नाही. जिल्हा पोलिसांचा कारवाईचा फार्स? बेकायदा कृत्यांवर जिल्हा पोलिसांचा अंकुश नसून अशा विविध माफियांकडून पोलीस चुकीच्या पद्धतीने पैसे घेत असल्याचे आरोप केले गेले आहेत. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सर्व अवैध धंदे वेळीच बंद केले होते व अशा चुकीच्या कृत्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली होती. मात्र आता जिल्ह्यात अवैध धंदे जोरात सुरू आहेत असे आरोप करत जिल्हा पोलिसांच्या विरोधात आदिवासी आगरी कुणबी एकता मंडळाने उच्च न्यायालयासह विविध स्तरांवर तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसांमार्फत कारवाईचा हा फार्स तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.