रस्तालगत कचऱ्याचा साठा; धूर, दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास डहाणू : तलासरी शहराला कचराभूमीची समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. कचराभूमीला जागा मिळत नसल्याने तलासरी पाटीलपाडा येथे साठवलेल्या कच-याच्या दुर्गंधीमुळे वाहतूकदार त्रस्त झाल्याने कचरासाठय़ाची जागा बदलण्याची मागणी होत आहे. तलासरी नगरपंचायतीने दोन वेळा कचराभूमीच्या जागेसाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र कोणीही अर्ज भरत नसल्याने तलासरी नगरपंचायतीचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे. तलासरी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये कचरा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मुंबई-अहमदाबाद महार्गालगत तलासरी बाजारपेठेशी पूर्व आणि पश्चिमेकडील ४० हून अधिक गावे जोडलेली आहेत. दिवसभरातून मोठय़ा प्रमाणात बाहेर फेकला जाणारा कचरा साठवण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावत आहे. तर नगरपंचायतीमध्ये स्वत:चा कचराभूमीसाठी भूखंड नसल्याने निर्जन जागेवर कचरा साठवून त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावत आहे. सद्यस्थितीत याच जागेवर कचरा जाळला जात असल्याने धूर आणि दुर्गंधी पसरुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तलासरीत निवासी वस्तीमध्ये मोठय़ा संख्येने वाढ होऊ लागली आहे. रस्त्याच्या कडेला साठवलेल्या कच-यात गुरे आणि कुत्रे उकिरडय़ावर वावरत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर दुर्गंधी आणि धूर पसरुन वाहतूकदारांमध्ये नाराजी पसरत आहे. नगरपंचायतीकडून कचराभूमीसाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तलासरी येथून उंबरगावला जाताना पाटीलपाडय़ाच्या पुढे कच-यावर फिरणारी गुरे आणि कुत्रे अचानक वाहनांसमोर येऊन अपघाताचे प्रसंग घडले आहेत. - अशोक रमण धोडी