कासा : चारोटी येथील प्रसिद्ध महालक्ष्मीची यात्रा सुरू झाली आहे . त्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ होऊन चारोटी येथील एकमेव सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्याचप्रमाणे सीएनजी पंपावर सीएनजीचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासही अधिकचा वेळ लागत आहे.
महामार्गावरील या सीएनजी केंद्रावर दररोज पहाटेपासून रिक्षाचालक, इको चालक, प्रवासी वाहने रांगा लावत उभी असतात. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाचीदेखील होत असते. या केंद्रावर जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावरून वाहने सीएनजी भरण्यासाठी येत असतात. जवळपास सीएनजी केंद्र नसल्याने मोठया रांगा लागतात. डहाणू, कासा, चारोटी, विक्रमगड, तलवाडा परिसरातील शेकडो गावखेडय़ांतुन मोठय़ा प्रमाणात वाहने या केंद्रावर येत आहेत. अनेक वेळा सीएनजी संपतो तर काही वेळा मुख्य सीएनजी केंदातून पुरवठा वेळवर होत नाही.
वाहनांच्या रांगा लांबच लांब लागत असल्याने बऱ्याचदा या रांगा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर लागलेल्या असतात. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगाने चालणारे वाहन सेवा रस्त्यावर येऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.