जव्हार तालुक्यातील झाप ते भोपतगड दरम्यानचा रस्ता खडी-मातीचाच नीरज राऊत पालघर : जव्हार तालुक्यातील भोपतगड किल्ला परिसरातील विकासासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च झाला असला तरीही झाप ते भोपतगड दरम्यानचा अधिकतर रस्ता अजूनही खडी-मातीचाच राहिला आहे. पर्यटन विकासासाठी इतका मोठय़ा प्रमाणात खर्च होत असताना पूर्ण झालेल्या कामांच्या दज्र्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटन विकासाचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे. जव्हारपासून सुमारे १७ किलोमीटरवर असणाऱ्या झाप या गावापासून तीन-साडेतीन किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये भोपतगड वसलेले आहे. या पर्यटन ठिकाणापर्यंत रस्ता तयार करणे, सुशोभीकरण करणे, रस्त्याचे मजबुतीकरण करणे, डांबरीकरण करणे व रस्त्यावर संरक्षण िभत बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यापैकी अधिक तर खर्च गेल्या अडीच तीन वर्षांत झाल्याचे दिसून आले आहे भोपतगडाच्या मार्गावर झाप ते चिंचपाडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गेल्या दहा वर्षांत हा रस्ता झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चिंचपाडात जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण झाल्याचे दिसून येत असून उर्वरित दीड किलो मीटर भाग डोंगराळ भागात असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पर्यटन विकासाच्या नावाने रस्ते संरक्षण िभत बांधणे सुशोभीकरण करणे अशा कारणास्तव खर्च झालेल्या खर्चाचा अपव्यय झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुर्गम भागातील पर्यटन केंद्र विकसित करताना जव्हारपासून भोपतगडपर्यंतच्या रस्त्यावर दिशादर्शक किंवा पर्यटनस्थळाची माहिती देणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यापासून पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्याचे धाडस सर्वसामान्य नागरिक करतील त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येत आहे. भोपतगड किल्ला परिसरातील जागा वनविभागाच्या अखत्यारीत असून त्या परिसरात आमूलाग्र बदल करण्यासाठी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता असून रस्ता उभारणीच्या नावाने सध्या जिल्हा प्रशासन पर्यटन विकास साधत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात जव्हार वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद मिळाला नाही. पालकमंत्र्यांचे मौन जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या नावाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच विशेष योजनेतून कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होत असला तरी प्रत्यक्ष पर्यटनस्थळावर त्याचा वापर होत नसल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. पर्यटनावर झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षणाबाबत किंवा चौकशी समिती गठित करण्याबाबत पालकमंत्री यांनी अजूनपर्यंत मौन पाळले आहे. साखळी क्रमांक नाही विविध योजनेतून भोपतगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे करताना अंदाजपत्रक तसेच इतर मान्यतांवर साखळी क्रमांकाचा उल्लेख नसल्याचे दिसून आली आहे. त्यामुळे ठक्करबाप्पासारख्या इतर योजनेतून झालेली कामे दाखवून लाखो रुपयांची रक्कम कामे न करता गिळंकृत करण्याचे प्रकार घडत आहेत.