स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डिजिटल स्वच्छता रथाचा शुभारंभ पालघर : जिल्हाभरात स्वच्छता, पाणी वापरविषयक प्रभावी पद्धतीने जागरूकता निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागांतील लोकांमध्ये स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण व्हवी या उद्देशाने डिजीटल माध्यमातून लघुपट, माहितीपट दाखवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ व जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचार-प्रसिद्धी करून जाणीवजागृती होऊन स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल स्वच्छता रथाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांअंतर्गत पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गावा-गावांत जनजागृती करण्याकरिता डिजिटल स्वच्छता रथाचा शुभारंभ रण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, खा. राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर व इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या स्वच्छता रथ माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना लघुपट दाखवून पाणी व स्वच्छता विषयासंबंधी योजना व उपक्रम याविषयी माहिती देण्यात येणार असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम, नादुरुस्त शौचालये दुरुस्त करणे, एक खड्डा शौचालयासाठी दुसरा खड्डा तयार करणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कामे करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक-सार्वजनिक स्तरावर शोषखड्डा मोहीम राबविणे, नाडेप व कंपोस्ट खड्डे तयार करणे तसेच गाव हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करणे यांचा समावेश आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणी करून प्रति दिन प्रति व्यक्ती ५५ लिटरप्रमाणे बारमाही स्वच्छ व गुणवत्तापूर्ण शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याकरिता लोकसहभागातून आराखडे तयार करणे, स्रोत बळकटीकरण करणे, महिलांना पाणी तपासणी प्रशिक्षण देणे, स्थानिक प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन यांना योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता प्रशिक्षण देणे इत्यादी उपक्रम अंतर्भूत आहेत.