पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधून प्रक्रिया केल्याशिवाय सांडपाणी खाडीमार्गे समुद्रात सोडल्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवादाने येथील उद्योजकांना २८० कोटी रुपयांचा दंड ठोठावला असताना, शनिवारी मुरबे- सातपाटी खाडीत रंगीत सांडपाणी आढळून आले. यामुळे खाडीतील मत्स्य संपदेला धोका निर्माण झाला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रिया केलेले सांडपाणी खाडी मार्गाने समुद्रात सोडणे अपेक्षित असते. याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून खाडीतील पाण्याचा रंग बदलला असून गेल्या दोन दिवसांपासून खाडीतील पाणी काळय़ाकुट्ट रंगाचे झाल्याचे सातपाटी येथील मच्छीमार विनोद पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या रासायनिक सांडपाण्यामुळे खाडीतील मासे मृत पावले असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते समुद्रात वाहून गेल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. एकीकडे हरित लवादाने तारापूर येथील उद्योजकांना दंड ठोठावून फटकारले असताना सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून नंतर असे सांडपाणी सोडण्याच्या उद्योजकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला नसल्याचे दिसून येते. मुरबे खाडी सळसकट रसायने सोडून खाडीतली जैविकता नष्ट करण्याचा प्रयत्न तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी करीत आहेत. निसर्गावर सुरू असलेल्या अतिक्रमण जर थांबले नाही तर या प्रशासनाला जागरूक करण्याचे काम आम्ही करणार आहोत. असे प्रकार जर थांबले नाहीत तर उद्रेक झाल्यास त्याला शासन आणि प्रशासन दोघे जबाबदार असतील. - विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती