वाडा : बुधवारपासुन शाळा सुरू झाल्या आहेत, वाडा तालुक्यातील अनेक गावे, खेडय़ांमध्ये माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने येथील विद्यार्थी एसटी बसने तालुका मुख्यालयी ये-जा करून शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक तेवढय़ा बसफेऱ्या नसल्याने या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष म्हणजेच शाळा १५ जूनपासून सुरू होतील असे शासनाकडून आधीच जाहीर केले होते. याची खबरदारी घेऊन एसटी महामंडळाने खेडोपाडय़ात जाणाऱ्या बसफेऱ्या वाढविणे अपेक्षित होते. मात्र गेले अनेक महिने भारमान (कमी उत्पन्न) अभावी बंद केलेल्या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानव विकासअंतर्गत लाखो रुपये खर्च करून प्रत्येक एसटी बस आगारात बसगाडय़ा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र या बसगाडय़ांची संख्या अत्यंत कमी असल्याने अनेक मार्गावर त्या धावत नाहीत. वाडा बस आगारात मानव विकासअंतर्गत फक्त सात बसेस देण्यात आलेल्या आहेत. गाव-खेडय़ातून वाडा या तालुका मुख्यालयी तसेच माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा असलेल्या कुडूस, विक्रमगड, गोऱ्हे येथील शाळेत येण्यासाठी या बसेस कमी पडत आहेत. तालुक्यातील ज्या परिसरात मानव विकासच्या बसेस जात नाहीत, त्या परिसरात एसटी महामंडळाने अन्य बस फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आसरा घेऊन शाळा गाठावी लागत आहे. पाच हजारांहून अधिक ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असून वाडा आगारात मानवविकासच्या बसेसची संख्या वाढविण्याची मागणी पालक वर्गानी केली आहे.शिक्षण विभागाकडून मिळालेल्या मार्गावर सध्या उपलब्ध असलेल्या मानव विकासच्या बसेस सुरू आहेत. - मधुकर धांगडा,आगार व्यवस्थापक, वाडा आगार